
मानखुर्दच्या महाराष्ट्र नगर परिसरात मेट्रोच्या कामामुळे जागोजागी चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. तसेच ठिकठिकाणी केलेल्या खोदकामामुळे वाहनचालकांना तासन्तास वाहतूककोंडीमध्ये अडकावे लागत आहे. स्थानिक रहिवाशांना होणाऱ्या या त्रासाविरोधात शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत ‘आक्रोश’ आंदोलन केले. एमएमआरडीएने संबंधित समस्या वेळीच न सोडवल्यास लढा आणखी तीव्र करू, असा इशारा शिवसेना शाखा क्र. 143च्या वतीने देण्यात आला.
मेट्रो मार्गिकेसाठी केलेले खोदकाम तसेच कारशेडसाठी टाकण्यात आलेल्या भरावाचा पावसाळ्यात महाराष्ट्र नगर येथील रहिवाशांना प्रचंड त्रास होत आहे. परिसरातील विद्यार्थी व पालकांना जागोजागी असलेल्या चिखलातून वाट काढून शाळेत जावे लागत आहे. तसेच मेट्रोच्या अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे तासन्तास वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. या विविध समस्या वेळीच सोडवण्यासाठी शिवसेना शाखा क्र. 143 यांच्या माध्यमातून विभागप्रमुख प्रमोद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शाखाप्रमुख किरण सावंत, शाखा संघटक सुवर्णा सावंत यांच्या माध्यमातून आक्रोश आंदोलन करण्यात आले. आंदोलनात स्थानिक नागरिक बहुसंख्येने सहभागी झाले होते. एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले जाणार असून परिसरातील समस्या वेळीच सोडवल्या नाहीत तर शिवसेना पूर्ण ताकदीने तीव्र आंदोलन उभे करेल, असा इशारा विभागप्रमुख प्रमोद शिंदे यांनी दिला.
या वेळी उपविभागप्रमुख रोहिदास ढेरंगे, संदीप भोईर, विधानसभा समन्वयक तानाजी गुरव, संगीता टेटमे, सतीश काळगावकर, गणेश पाटील, बळवंत यादव, रजनी रमण, अशोक कवळे, लक्ष्मण जानकर, वैभव जाधव, दीपाली कोंडाळकर, प्रवीण कुंभार, अक्षय गावडे, राम भादवणकर, सागर अलदार, प्रशांत साळुंखे आदी उपस्थित होते.