
गिरणी कामगारांना मुंबईतच हक्काचे घर मिळाले पाहिजे, या प्रमुख मागणीसाठी गिरणी कामगार आणि त्यांचे वारस येत्या 9 जुलै रोजी भायखळा येथील वीरमाता जीजाबाई भोसले उद्यान ते विधान भवन यादरम्यान लाँगमार्च काढणार आहे. गिरणी कामगारांच्या प्रश्नावरील सरकारच्या वेळकाढूपणामुळे कामगार आणि वारसांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशनात म्हणजेच 9 जुलै रोजी लाँगमार्च काढण्याचा निर्णय घेतला आहे. गिरणी कामगार संयुक्त लढा समितीच्या वतीने आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष, शिवसेना उपनेते – आमदार सचिन अहिर यांनी या आंदोलनाची घोषणा केली.
गिरणी कामगारांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी अनेक कामगार संघटना स्वतंत्रपणे लढत होत्या, परंतु गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नावर लढा परिणामकारक ठरावा यासाठी 14 कामगार संघटनांची गिरणी कामगार संयुक्त लढा समिती गठीत करण्यात आली आहे, असे सचिन अहिर यावेळी म्हणाले. यावेळी राष्ट्रीय मिल मजदूर संघ, सर्व श्रमिक संघटना, गिरणी कामगार सेना, हेमंत धागा जन कल्याण फाऊंडेशन, संयुक्त मराठी मुंबई चळवळ, एनटीसी कामगार असोसिएशन, गिरणी कामगार वारस संघर्ष सेवा समिती, गिरणी कामगार सभा, मुंबई गिरणी कामगार युनियन, सातारा जिल्हा कामगार समिती, गिरणी कामगार रोजगार आणि निवारा, कल्याण सेवाभावी संस्था, कोन पनवेल गिरणी कामगार संकुल एकता समिती आणि जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र या 14 कामगार संघटनांचे नेते उपस्थित होते.
आंदोलनाला वाढता पाठिंबा
गिरणी कामगार संयुक्त लढा समितीच्या वतीने आमदार सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली रविवारी विधान भवनात आमदारांची भेट घेतली. यावेळी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना नेते-आमदार अॅड. अनिल परब, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, आमदार जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे आदींची भेट घेऊन त्यांना 9 जुलैच्या आंदोलनाला भेट देण्याचे आमंत्रण देण्यात आले. सर्वच मान्यवरांनी आंदोलन यशस्वी करण्याचे आश्वासन दिले आहे.