
पहिल्या डावात 132 धावांची जबरदस्त आघाडी आणि त्यानंतर विजयासाठी दीडशेपेक्षा अधिक षटकांत 378 धावांचे जबर आव्हान दिल्यानंतरही हिंदुस्थानला यजमान इंग्लंडविरुद्ध अनपेक्षित हार सहन करावी लागली होती. बरोबर तीन वर्षांपूर्वी एजबॅस्टनवर झालेल्या कसोटीत हिंदुस्थानचा विजय निश्चित मानला जात होता. तरीही हिंदुस्थान हरला आणि एजबॅस्टन स्टेडियमवर गेल्या सहा दशकांपासून हरण्याची मालिका खंडित होऊ शकली नाही. गेल्या 58 वर्षांत हिंदुस्थान एजबॅस्टनवर एकदाही विजयाचे चुंबन घेऊ शकलेला नाही. त्यामुळे हिंदुस्थानी संघ उद्यापासून सुरू होणाऱ्या कसोटीत पराभवाची परंपरा खंडित करतो की पुन्हा एकदा त्याच परंपरेचा भाग होतो, याबाबत साऱयांनाच उत्सुकता लागलीय.
1967 साली हिंदुस्थानचा संघ मन्सूर अली खान पतौडीच्या नेतृत्वाखाली इंग्लंड दौऱ्यात तीन कसोटींची मालिका खेळला. या दौऱ्यातील तिसरा कसोटी सामना बार्ंमगहॅमवर खेळला गेला होता. आधीच 2-0ने पिछाडीवर असलेल्या हिंदुस्थानला एजबॅस्टनवरील आपल्या पहिल्या कसोटीत तिसऱ्याच दिवशी 132 धावांनी हार सहन करावी लागली. या कसोटीत हिंदुस्थानसमोर तीन दिवसांत 410 धावा करायच्या होत्या, पण हिंदुस्थानने 277 धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर पुढील दोन दौऱयांत हिंदुस्थानला एजबॅस्टनवर डावाने हरण्याची नामुष्की सहन करावी लागली होती.
1986 च्या दौऱ्यात कपिल देवचा संघ फूल फॉर्मात होता. आधी लॉर्ड्सवर हरवण्याचा पराक्रम केला आणि त्यानंतर लीड्सवर इंग्लंडला नमवत मालिका जिंकण्याचा इतिहास घडवला. या दोन विजयांमुळे हिंदुस्थानला एजबॅस्टनवर हॅट्ट्रिकची सुवर्ण संधी होती. पण हिंदुस्थान थोडक्यात कमी पडला. शेवटच्या दिवशी 80 षटकांत हिंदुस्थानला हॅटट्रिकसाठी 236 धावांचा पल्ला गाठायचा होता, पण फिल एडमण्ड्सने चार धावांत मोहिंदर अमरनाथ, दिलीप वेंगसरकर, सुनील गावसकर आणि रवी शास्त्राr या चार महारथींना बाद करत 1 बाद 101 वरून 5 बाद 105 अशी अवस्था केली आणि विजयासाठी प्रयत्न करणारा हिंदुस्थानी संघ बॅकफूटवर गेला. अझरुद्दीन आणि किरण मोरे यांनी अत्यंत सावध खेळ करत सामना अनिर्णित राखण्यातच धन्यता मानली. या कसोटीच्या शेवटच्या दिवशी हिंदुस्थानने 78 षटकांत 5 बाद 174 धावा केल्या. एजबॅस्टनवर पहिलावहिला विजय नोंदविण्याची संधी होती, ती हिंदुस्थानी फलंदाजांना साधता आली नाही.
1996 सालच्या दौऱ्यात एजबॅस्टनवर पहिला कसोटी सामना खेळला गेला आणि या सामन्यात हिंदुस्थानच्या पराभवाची मालिका कायमच राहिली. त्यानंतर तब्बल 15 वर्षांनंतर एजबॅस्टनला आणखी एक सामना खेळला गेला, ज्यात हिंदुस्थानला डावाच्या पराभवाची झळ सोसावी लागली. मात्र 2018 साली विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली मालिकेतील पहिला कसोटी सामना एजबॅस्टनवर खेळविण्यात आला. या कसोटीत विराट कोहलीच्या झुंजार खेळाने सामना फिरवला होता. पहिल्या डावात विराटच्या 149 धावांच्या एकाकी झुंजीमुळे हिंदुस्थान फक्त 13 धावांनी पिछाडीवर पडला होता. या कसोटीत इशांत शर्मा आणि रविचंद्रन अश्विनने इंग्लंडचा डाव 180 धावांत गुंडाळला. त्यामुळे हिंदुस्थानला कसोटी विजयासाठी फक्त 194 धावा करायच्या होत्या. तब्बल अडीच दिवसांचा खेळही शिल्लक होता. पण तिसऱ्या दिवशी हिंदुस्थानची 5 बाद 110 अशी अवस्था झाली. कोहली मैदानात होता. चौथ्या दिवशी 84 धावांची गरज होती, पण कोहलीची खेळी 51 धावांवर संपली. मग अवघ्या 162 धावांवर हिंदुस्थानचा डाव संपला आणि आपण 31 धावांनी हरलो.
एजबॅस्टन हिंदुस्थानसाठी अनलकीच
हिंदुस्थान गेल्या सहा दशकांत एजबॅस्टनवर इंग्लंडविरुद्ध आठ कसोटी खेळलाय आणि एक अनिर्णित कसोटी सामना वगळता उर्वरित सातही कसोटींत हिंदुस्थानला पराभव पत्करावा लागलाय. म्हणजेच इंग्लंड एजबॅस्टनवर अपराजित आहे तर हिंदुस्थान अनलकी. एजबॅस्टनच्या सवाशे वर्षांच्या इतिहासात इंग्लंड 56 कसोटींपैकी 30 कसोटी जिंकलाय, तर केवळ 11 कसोटींत हरलाय. विशेष म्हणजे एजबॅस्टनवर विंडीजने सर्वाधिक विजय मिळवले असले तरी ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड या संघांनीही इंग्लंडला हरवण्याची किमया साधली आहे. जी हिंदुस्थानी संघाला अद्याप साधता आलेली नाही.