महाराष्ट्र, मराठी भाषा, मराठी माणूस याच्यावर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही! राज ठाकरे यांनी ठणकावलं

मराठी या एका विषयासाठी सत्तेवरही लाथ मारण्याचे संस्कार झाले असतील तो मराठीसाठी तडजोड करेल काय? बाकी युत्या, आघाड्या होत राहतील पण महाराष्ट्र, मराठी भाषा, मराठी माणूस याच्यावर कोणत्याही परिस्थिती तडजोड होणार नाही, कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना ठणकावलं. आपल्या खास शैलित समाचार घेताना ‘कोणाची माय व्ययली आहे त्याने महाराष्ट्राला हात घालून दाखवावा, मुंबईला हात घालून दाखवावा. मजाक वाटला काय? आम्ही शांत आहोत याचा अर्थ गांडू नाही’, असे राज ठाकरे गरजले.

सन्माननीय उद्धव ठाकरे आणि बाहेर जमलेल्या सर्व तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो…, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हणताच वरळी एनएससीआय डोम टाळ्यांचा कडकडाट आणि शिट्यांनी दणाणून उठला. खरंतर आज मोर्चा निघायला पाहिजे होता. मराठी माणूस कसा सर्व बाजूने एकवटतो याचं एक चित्र मोठ्याप्रमाणावर उभं राहिलं असतं. नुसत्या मोर्चाच्या चर्चेनेच माघार घ्यावी लागली. खरंतर आजचाही मेळावा शिवतीर्थावरती मैदानात व्हायला पाहिजे होता. मैदान ओसंडून वाहिलं असतं. पण पाऊस आहे, असे राज ठाकरे म्हणाले.

“जवळपास 20 वर्षांनंतर मी आणि उद्धव आम्ही एका व्यासपीठावरती…”

मी माझ्या मुलाखतीत एक म्हटलं होतं की ज्याच्यातनं या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या होत्या. त्यावेळी मी असं म्हटलं होतं की, कोणत्याही वादापेक्षा आणि कुठल्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. आज जवळपास 20 वर्षांनंतर मी आणि उद्धव आम्ही एका व्यासपीठावरती येत आहोत. जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही आम्हाला दोघांना एकत्र आणायचं ते देवेंद्र फडणवीसला जमलं, असा सणसणीत टोला राज ठाकरे यांनी लगावला.

“महाराष्ट्र ज्यावेळेला पेटून उठतो त्यावेळी काय घडतं आणि काय होतं हे आज राज्यकर्त्यांना समजलं असेल”

खरंतर आजचा हा मेळावा… मोर्चालाही तीच घोषणा होती आणि आजच्या मेळाव्यालाही तीच घोषणा आहे की कुठलाही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा… माझ्या मराठीकडे माझ्या महाराष्ट्राकडे वेड्या वाकड्या नजरेनं पाहायचं नाही कोणी… खरंतर हा प्रश्नच अनाठायी होता, काही गरज नव्हती. हे कुठून अचानक हिंदीचं आलं काही कळचं नाही. आणि हिंदी कशासाठी? कोणासाठी हिंदी? त्या लहान लहान मुलांवर जबरदस्ती करताय तुम्ही. कोणाला विचायरचं नाही, शिक्षणतज्ज्ञांना विचायरायचं नाही, बस आमची सत्ता आहे, आमचं बहुमत आहे आम्ही लादणार. तुमच्या हातात सत्ता असेल ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे रस्त्यावर. एक पत्र लिहिलं दोन पत्र लिहिली नंतर ते दादा भुसे माझ्याकडे आले. म्हणाले की, आम्ही काय म्हणतोय ते समजून तर घ्या. म्हटलं तुम्ही काय सांगताय ते ऐकून घेईन पण ऐकणार नाही. मराठीच्या विषयामध्ये तुम्ही तिसरी भाषा लादताय. कुठलं त्रिभाषा सूत्र. त्रिभाषा सूत्र ज्यावेळेला आलं ते फक्त केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामधल्या दुव्यासाठी हे त्रिभाषा सूत्र आणलं. तुम्ही हायकोर्टात जा, सुप्रीम कोर्टात जा इंग्रजीमध्ये सगळ्या गोष्टी होतात, कुठे आहे त्रिभाषा सूत्र? केंद्राच्या शिक्षण धोरणातही नाही. इतर कोणत्या राज्यातही नाही. महाराष्ट्रात प्रयोग करून पाहिला त्यांनी. दक्षिणेतील राज्य हिंग लावून विचारत नाही त्यांना… पण महाराष्ट्र ज्यावेळेला पेटून उठतो त्यावेळी काय घडतं आणि काय होतं हे आज राज्यकर्त्यांना समजलं असेल. त्याशिवाय का माघार घेतली? असा घणाघात राज ठाकरे यांनी केला.

“म्हणतायेत हिंदी शिका, कोणासाठी शिकायचं?”

विनाकारण आणलेला विषय होता. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश कोणती तिसरी भाषा आणणार आहेत? खरंतर आणली पाहिजे. गंमत बघा हिंदी भाषिक राज्य आहेत ती आर्थिकदृष्ट्या मागास आणि हिंदी न बोलणारी जी राज्य आहेत ती आर्थिकृष्ट्या प्रगत आणि वर आम्ही हिंदी शिकायचं. यांना हिंदीतून राज्य नाही सांभाळता आली. यांना राज्यांचा विकास करता आला नाही. जे हिंदी बोलत नाही त्या राज्यांमध्ये हिंदी बोलत असलेल्या राज्यांमधून नोकरी धंद्यासाठी लोक इकडे येतायेत. आणि हे म्हणतायेत हिंदी शिका, कोणासाठी शिकायचं? पाचवीनंतर हिंदी चित्रपटसृष्टीत जाणार आहे का मुलगा? कोणासाठी शिकायचं? हिंदी भाषेबद्दल मला वाईट वाटत नाही. भाषा कोणतीही श्रेष्ठच असते, उत्तमच असते. मग ती मराठी, तामीळ, पंजाबी, गुजराती, बंगाली असेल, हिंदी असेल अजून कुठलीही असेल. एक भाषा उभी करायला खूप प्रचंड तपश्चर्या लागते, खूप लोकांची मेहनत असते. एक लिपी उभी करायला खूप प्रचंड ताकद लागते. अशाच भाषा काही उभ्या राहत नसतात. आणि हे भाषेचं नवीन कुठून आणलं. त्या दिवशी अमित शहा म्हणाले, ज्याला इंग्रजी येतं त्याला पुढे जावून लाज वाटेल म्हणे मला इंग्रजी येतं म्हणून. तुम्हाला नाही येत? असा सवाल करत राज ठाकरे यांनी अमित शहांवर निशाणा साधला.

“आम्ही शांत आहोत याचा अर्थ गांडू नाही”

संपूर्ण हिंद प्रांतावरती 125 वर्षे मराठ्यांनी राज्य केलं. इतक्या राज्यांवरती आम्ही राज्य केलं. आम्ही मराठी लादली? गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब इतर सगळ्या प्रांतात, अटोकपर्यंत पोहोचले होते मराठा साम्राज्य, आम्ही लादली? हिंदी भाषा दोनशे वर्षांपूर्वीची भाषा आहे. महाराजांच्या काळातही नव्हती. कशासाठी कोणासाठी आणि काय करायचंय नेमकं? यांनी फक्त चाचपडून पाहिलं. मुंबई स्वतंत्र करता येते का? यासाठी आधी थोडसं भाषेला डिवचून बघू. महाराष्ट्र शांत राहिला तर पुढे ते पाऊल टाकू. कोणाची माय व्यायली आहे त्याने महाराष्ट्राला हात घालून दाखवावा, मुंबईला हात घालून दाखवावा. मजाक वाटला काय? आम्ही शांत आहोत याचा अर्थ गांडू नाही आहोत. काही अंगावरती लादायचा प्रयत्न करता, असे म्हणत राज ठाकरे यांनी ठणकावले.

“कोणा-कोणाची मुलं परदेशात शिकतायेत याद्या आहेत आमच्याकडे?”

आता माघार घेतली ना. माघार घेतली ना मग त्याचं काय करायचं. मग वेगळ्या ठिकाणी वळवा सगळं प्रकरण. म्हणजे कुठे? ठाकऱ्यांची मुलं इंग्रजीमध्ये शिकली. बरं मग पुढे? म्हणजे दादा भुसे मराठी मीडियममध्ये शिकून शिक्षणमंत्री झाले. देवेंद्र फडणवीस इंग्रजी मीडियममध्ये शिकून मुख्यमंत्री झाले. कुठे काय शिकले याचा काय संबंध? कोणा-कोणाची मुलं परदेशात शिकतायेत याद्या आहेत आमच्याकडे? त्याचं काय करणार आहात तुम्ही? आणि त्याच्यातल्या त्याच्यात मंत्रिमंडळातील एक-एक मंत्र्याचं हिंदी ऐका फेफरं येईल फेफरं… हे असले प्रश्न महाराष्ट्रातच विचारले जातात, असे म्हणत राज ठाकरे यांनी फटकारले.

आता मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो… आम्ही मराठी मीडियममध्ये शिकलो, आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, याच्यावर तुम्ही प्रश्न विचारता यांना मराठीचा पुळका कसा? हे इंग्रजी मीडियममध्ये टाकतात. बरं, सन्माननीय माननीय बाळासाहेब ठाकरे आणि माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजी मीडियममध्ये शिकलेले आहेत. या दोघांवरती तुम्ही मराठीबद्दल शंका घेऊ शकता का? असा सवाल करत राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढवला.

“तुमचा कडवटपण हे तुम्ही शिक्षण कुठे घेतलं यावर नसतो तो कडवटपणा तुमच्या आतमध्ये असावा लागतो”

लालकृष्ण अडवाणी सेंट पॅट्रीक हायस्कूल, कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकलेले आहेत लालकृष्ण अडवाणी. त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का? दक्षिण हिंदुस्थानात बघा, तमीळ, तेलुगुच्या प्रश्नावरती कडवटपणे समोर येऊन उभे राहतात. कोण विचारत नाही त्यांना तुमची मुलं कुठे शिकली आणि तुम्ही कुठे शिकलात. उद्या मी हिब्रू भाषा शिकेने आणि मराठीपणाचा कडवट अभिमान बाळगेल, असे सांगत राज ठाकरे यांनी दक्षिण हिंदुस्थानातील इंग्रजी माध्यमात शिकलेले नेते आणि अभिनेत्यांची यादीच वाचून दाखवली. परवा तमिळनाडूमध्ये एक कार्यक्रम झाला. ए आर रहमान व्यासपीठावर उभे होते. त्या बाई तमिळमध्ये बोलत होत्या. अचानक ती बाई हिंदीत बोलायला लागली. त्यावर रहमान यांनी तिच्याकडे बघितलं बोलला हिंदी आणि व्यासपीठावरून खाली उतरला. तुमचा कडवटपण हे तुम्ही शिक्षण कुठे घेतलं यावर नसतो तो कडवटपणा तुमच्या आतमध्ये असावा लागतो, असे राज ठाकरे पुढे म्हणाले.

“मराठी म्हणून तुम्हाला कधीही एकत्र येऊ देणार नाहीत, हे जातीपातीमध्ये विभागायला सुरुवात करतील”

माननीय बाळासाहेब इंग्रजीत शिकले. इंग्रजी वर्तमानपत्रांमध्ये व्यंगचित्र काढायचे. पण मराठीचा अभिमान याबाबतीत कधी तडजोड नाही केली. म्हणे एक भाषा सगळ्यांना बांधून ठेवते. कुठली एक भाषा? आजपर्यंत काय वाकडं झालं? आपल्या संरक्षणखात्यामध्ये जेवढी रेजिमेंट्स आहेत… मद्रास रेजिमेंट, राजपुताना रायफल्स, राजपूत रेजिमेंट, डोगरा रेजिमेंट, शिख रेजिमेंट, जाट रेजिमेंट, पॅराशूट रेजिमेंट, पंजाब रेजिमेंट, ग्रेनेडियर्स, शिख लाइट इन्फ्रंट्री, मराठा लाइट इन्फ्रंट्री, गढवाल रायफल्स, कुमाउ रेजिमेंट, असाम रेजिमेंट, बिहार रेजिमेंट, महार रेजिमेंट, जम्मू-कश्मीर रायफल्स, जम्मू-कश्मीर लाइट इन्फ्रंट्री, नागा रेजिमेंट, गोरखा रायफल्स, लडाख स्काउस्ट, अरुणाचल स्काउट्स, सिक्कीम स्काउट्स आहेत… इतक्या राज्यांचे आज आपल्या संरक्षण खात्यात लोक आहेत. इतक्या रेजिमेंट्स आहेत. शत्रू दिसला की एकत्र तुटून पडतात ना. भाषेचा प्रश्न येतो कुठे? देशात ज्यावेळेला भाषावार प्रांतरचना झाली तीच या गोष्टींसाठी झाली ना की, प्रत्येक भाग त्या भाषांचे होते म्हणून. मग या सगळ्या गोष्टी का सुरू केल्यात तुम्ही? कशासाठी सुरू केल्यात? काय आहे यामाचं राजकारण? आताच सांगून ठेवतो, आज तुम्ही सगळेजण मराठी म्हणून एकत्र आलात, आज महाराष्ट्रातला तमाम मराठी आज मराठी म्हणून एकत्र आला. याचं पुढचं राजकारण यांचं पुन्हा तुम्हाला जातीमध्ये विभागायला सुरुवात करतील. पुन्हा हे जातीचं कार्ड खेळायला सुरुवात करणार. मराठी म्हणून तुम्हाला कधीही एकत्र येऊ देणार नाहीत. हे जातीपातीमध्ये विभागायला सुरुवात करतील, असे सांगत राज ठाकरे यांनी सावध केले.

“जास्त नाटकं केली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे, पण चूक त्यांची असली पाहिजे”

आता हे सुरुवात करतील. काल कोणाच्यातरी व्यापाऱ्याच्या कानफडीत मारली. मीरा-भाईंदरला त्याच्या काय इथे लिहिलं होतं का गुजराती? हिंदी चॅनेलवाल्यांनी चालवलं गुजराती माणसाला मारलं. कुठल्या गुजराती माणसाला मारलं? बाचाबाचीमध्ये समोरचा गुजराती निघाला इकडचा गुजराती निघाला, त्याच्यामध्ये गुजरातीला मारलं का? केवढे व्यापारी आहेत. अजून तर काहीच केलेलं नाही. अर्थात त्यांना मराठी आली पाहिजे याच्याबद्दल वाद नाही. विनाकारण उठसूट मारामारी करायची गरज नाही. पण जर जास्त नाटकं केली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे. पण चूक त्यांची असली पाहिजे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा अशी कधीही गोष्ट कराल त्याचे व्हिडिओ काढू नका. आपल्याआपल्यातच त्यांना कळलं पाहिजे. मारणारा कधी सांगत नसतो मार खाणारा सांगत असतो, मला मारलं मला मारलं म्हणून. त्यांना सांगू देत. अनेक गुजराती लोक आहे, माझ्या अनेक परिचयाचे आहेत. माझे एक मित्र आहेत नयन शहा म्हणून… त्याला मी गुजराठी म्हणतो. तुमचा विश्वास बसणार नाही इतकं अप्रतिम मराठी बोलतो. शिवाजीपार्क मैदानावर फिरताना कानाला हेडफोन लावून पु. ल. देशपांडे ऐकणारा गुजराती आहे, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

“मी एवढा महाराष्ट्रासाठी, मराठीसाठी कडवट का झालो?”

मराठीचं बाळकडू … आमच्यासाठी ते बाळकडूचं होतं. हे आमच्या धमण्यांमध्ये आलं कुठून? मी एवढा महाराष्ट्रासाठी, मराठीसाठी कडवट का झालो? लहानपणापासूनचे अनेक प्रसंग आहेत. माननीय बाळासाहेबांबरोबरचे. पण मी एक प्रसंग कधीही विसरणार नाही. तो प्रसंग 1999 सालचा आहे. 1999 साली शिवसेना-भाजपचं सरकार येणार की नाही येणार? अशी परिस्थिती होती. पवारसाहेबांनी त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला होता, वेगवेगळे लढले होते. शिवसेना-भाजपच्या वादामध्ये काहीच होईना. दिवसामागून दिवस चाललेत. एक दिवस मातोश्री येथे खाली बसलो होतो दुपारची वेळ होती. अचानक दोन गाड्या लावल्या. प्रकाश जावडेकर आणि काही मंडळी आली. म्हणाले, बाळासाहेबांना अर्जंट भेटायचं आहे. म्हटलं, आता त्यांना भेटता येणार नाही, ही त्यांची झोपायची वेळ आहे. अर्जंट आहे म्हणाले. म्हटलं, विषय काय आहे, मी बोलायचं काम करतो. ते म्हणाले, त्यांना सांगा मुख्यमंत्रीपदाचा विषय झालेला आहे. सुरेशदादा जैन यांना दोन्ही बाजूने ठरवलंय की त्यांना मुख्यमंत्री करायचं. एवढं फक्त बाळासाहेबांना सांगायचं आहे, असं ते म्हणाले. मी वर गेलो. बाळासाहेब गाढ झोपलेले होते. मी त्यांना उठवलं. जावडेकर आणि मंडळी आली आहेत,असं सांगितलं. ते म्हणाले मुख्यमंत्रीपदाचा विषय झाला आहे. सुरेशदादा जैन यांना मुख्यमंत्रीपदासाठी दोन्ही बाजूंनी करायचं ठरवलंय, असं सांगितलं. ते म्हणाले, त्यांना जाऊन सांग महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठीच होईल, दुसरा कोणी होणार नाही. मराठी या एका विषयासाठी मला तिकडे कळलं या माणसाने सत्तेवर लाथ मारली. हे संस्कार ज्या पोरावरती झाले असतील तो मराठीसाठी तडजोड करेल काय? बाकी सगळ्या युत्या-आघाड्या कुठल्याही गोष्टी होत राहतील. महाराष्ट्र, मराठी, मराठी माणूस, मराठी भाषा याच्यावर तडजोड होणार नाही. कोणत्याही परिस्थितीत होणार नाही, असा थेट इशारा राज ठाकरे यांनी दिला.

यापुढे तुम्ही सर्वांनी सावध आणि सतर्क असणं गरजेचं आहे. पुढे-पुढे काय-काय गोष्टी होतील कल्पना नाही. परंतु मला असं वाटतं ही मराठीसाठीची एकजूट ही कायम राहावी. आणि महाराष्ट्रामध्ये सन्माननीय माननीय बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं ते पुन्हा साकारावं, अशी एक आशा, आपेक्षा आणि इच्छा व्यक्त करतो, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.