साखरपुड्याहून परतत असताना वाटेतच काळाचा घाला, मिनी बसची ट्रकला धडक; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

साखरपुडा समारंभ आटोपून घरी परतत असताना मिनी बसने ट्रकला धडक दिल्याने रविवारी सकाळी भीषण अपघात घडला. या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले. जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये चार महिलांचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.

राजस्थानमधील कोटा येथील दिल्ली-मुंबई महामार्गावर रविवारी पहाटे 3.30 वाजता हा अपघात घडला. करौली जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील 14-15 सदस्य मिनीबसने साखरपुडा समांरंभाहून घरी परतत होते. दिल्ली-मुंबई महामार्गावर बोरखेडाजवळ चालकाला डुलकी आल्याने बस अनियंत्रित झाली आणि रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर धडकली. यात चौघांचा मृत्यू झाला. गीता सोनी, बृजेश सोनी, अनिल सोनी आणि सुरेश सोनी अशी मयतांची नावे आहेत. सर्वजण अनिल सोनी यांच्या मुलाच्या साखरपुड्याहून परतत होते.