
जिनांच्या थडग्यावर डोकं टेकवणारे ज्यांचे नेते आहेत त्यांनी आम्हाला देशभक्ती शिकवू नये अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच अंगात सिंदूर नव्हे तर अंगात देशभक्ती भिनली पाहिजे असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.
मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले की, आपल्या देशाला एक कणखर पंतप्रधान लाभेल अशी आमची आशा होती आणि म्हणून आम्ही त्यावेळी पाठिंबा दिला होता. पण आपली परदेश नीतीही सरपटणारी ठरलेली आहे. बुळबळीत, गुळगळीत आणि कणाहीन असे सरकार आपल्याला न्याय देईल असे वाटत नाही. इतकंच नाही तर पाकव्याप्त कश्मीर परत घेईल असे वाटत नाही.
तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याला मी महत्त्व देत नाही, जिनांच्या थडग्यावर डोकं टेकवणारे ज्यांचे नेते आहेत त्यांनी आम्हाला देशभक्ती शिकवू नये असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
क्रिकेटमध्ये विकेट गेला की पुढची मॅच तो खेळाडू खेळू शकतो. पण जवान शहीद झाला तर त्याचे कुटुंब उद्ध्वस्त होतं. ते पुन्हा उभं नाही राहू शकत. त्यामुळे क्रिकेटमधली विकेट ही शहीद होण्यातला फरक मोठा आहे. त्यामुळे क्रिकेट आणि युद्ध हा भंपकपणा आहे. यांना व्यापार करायचा आहे आणि त्यांनी देशभक्तीचा व्यापार सुरू केला आहे.
बीसीआयकडे खुप पैसे आहेत. तेच तिकिट विकत घेतील आणि इथून 500 रुपये देऊन लोकांना क्रिकेट मॅच पहायला लावतील. जोपर्यंत हे दहशतवादी हल्ले थांबत नाही तोवर पाकिस्तानशी सर्व संबंध तोडले पाहिजेत. राष्ट्रगीत जेव्हा आपल्या कानावर येतं तेव्हा आपण उभे राहतो तशी राष्ट्रभक्ती आपल्या रक्तात भिनली पाहिजे. अंगात सिंदूर नव्हे तर अंगात देशभक्ती भिनली पाहिजे असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.