बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची एसआयटी चौकशी करा; हायकोर्टात याचिका, पुढील आठवड्यात सुनावणी

माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचा तपास करण्यात पोलिसांना अपयश येत असून, या प्रकरणाचा तपास एसआयटीमार्फत करण्यात यावा, अशी मागणी करत बाबा सिद्दिकी यांची पत्नी शेहझीन यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

12 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री मुंबईतील वांद्रे (पूर्व) येथे तीन हल्लेखोरांनी बाबा सिद्दिकी (66) यांची गोळ्या घालून हत्या केली. लॉरेन्स बिष्णोई टोळीने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. याप्रकरणी पोलिसांनी काही आरोपींना अटक केली असून 26 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे, तर अनमोल बिष्णोई आणि इतर दोघांचा पोलीस शोध घेत आहेत. सर्व आरोपींवर ‘मकोका’अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. पतीच्या मृत्यूमागे बिल्डर लॉबी आणि एका राजकीय नेत्याचा सहभाग असल्याचा दाट संशय शेहझीन यांनी याचिकेद्वारे व्यक्त केला आहे. सिद्दिकी यांचे झोपडपट्टीवासीयांशी हितसंबंध होते आणि म्हणूनच परिसरातील अनेक विकासक आणि बांधकाम व्यावसायिक त्यांना अडथळा मानत होते. या दृष्टिकोनातून पोलिसांनी कधीही चौकशी केली नसल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.