रत्नागिरीत महायुती फुटली! अजित पवार गटाचे नगराध्यक्षपदासह स्वतंत्र उमेदवार

रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीत महायुतीत फूट पडली आहे. महायुतीतील घटक अजित पवार गटाने नगराध्यक्षपदासह काही नगरसेवकपदासाठी स्वतंत्र अर्ज भरल्याने महायुतीत बेबनाव दिसून आला आहे. महायुती तोडण्याचा आदेश हा अजित पवार गटाच्या प्रदेशस्तरावरून आला की स्थानिक मंडळीनीच ही भूमिका घेतली याबाबत कुणीही बोलायला तयार नाही. अजित पवार गटाकडून बशीर मुर्तुझा यांच्या पत्नी वाहिदा मुर्तुझा यांनी आज रत्नागिरी नगराध्यक्षपदासाठी अर्ज भरला. त्याचबरोबर अजित पवार गटातून अन्य काही उमेदवारांनी नगरसेवक पदासाठी अर्ज भरले.

तत्पूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश चिटणीस बशीर मुर्तुझा यांनी अचानक पक्षांतर करत अजित पवार गटात प्रवेश करत पत्नीला निवडणूक रिंगणात उतरवल्याने महायुतीच फुटली आहे. भाजपातील तीन उमेदवारांना शिंदे गटातून उमेदवारी देणाऱ्या पालकमंत्री उदय सामंत यांना या घडामोडींमुळे मोठा धक्का बसल्याची चर्चा आहे. अजित पवार गट महायुतीतून फुटल्यामुळे जिह्याच्या राजकारणात काय परिणाम होणार याबाबत चर्चांना ऊत आला आहे. अजित पवार गटाने स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे महायुती बुडणार की फक्त हात ओले होणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.