
भाजपने तुम्हाला फोडले तेव्हा आनंदाने आणि सत्तालोभाने स्वतःला फोडून घेतले. आता भाजप तुमच्याही गटाचे लचके तोडतोय म्हटल्यावर बोंब मारून काय होणार? तुमच्या नाराजीची धुळवड बिनरंगाची आहे आणि प्रत्येक वेळी ही धूळ जशी उडते तशीच खाली बसते. भाजपवाल्यांच्या डोळ्यांत जराही जात नाही. तुम्ही सत्तेत जरूर आहात, पण भाजपवाले ना तुम्हाला ‘राजी’ करण्याचे कष्ट घेतात ना तुमच्या ‘नाराजी’ला भीक घालतात. मिंधे गटाने जे पेरले त्याची फळे त्यांना मिळत आहेत. त्यामुळे ‘भोगा आपल्या कर्माची फळे’ इतकेच आम्ही सांगू शकतो.
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मिंधे गटास चणे-फुटाण्याइतकीही किंमत नाही. तरी हे चणे-फुटाणे या ना त्या विषयावर तडतडत असतात. ‘‘आम्ही नाराज आहोत बरे,’’ असे मुंबईत बोलायचे व दिल्लीत जाऊन अमित शहांचे चरण धुवायचे अशा या मिंधे गटाचा म्हणे मंगळवारी नाराजीचा स्फोट झाला आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कॅबिनेटवर बहिष्कार टाकण्याची हिंमत या लोकांत खरेच आहे काय? मिंधे यांच्या पक्षाचे लोक भाजपवाले फोडत आहेत. राज्यात सध्या सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपवाल्यांकडून ‘ऑपरेशन लोटस’ घडवून मित्रपक्षांनाच सुरुंग लावला जात आहे. अर्थात, त्यात नवीन काय आहे? भाजपवाल्यांचे राजकारण दशकानुदशके असेच सुरू आहे. तरीही या फोटोफोडीचे हादरे मिंधे गटाला जास्त बसले असावेत. त्या अस्वस्थतेतूनच नाराजी नाट्याचा आणखी एक फसलेला प्रयोग पार पडला असावा. असे नाराजी नाटकाचे अंक खुद्द मिंधे यांनी यापूर्वीही सादर केले आहेत. कधी रुसून साताऱ्याला स्वतःच्या शेतात जाऊन बस, तर कधी दिल्लीत जाऊन मोदी-शहांकडे रडकथा सांग. मात्र त्याचा भाजपवर कितपत परिणाम झालाय हे भाजपवाल्यांकडून ठिकठिकाणी सुरू असलेल्या फोडाफोडीतून दिसतेच आहे. तरीही मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत मिंधे गटाने हा
नाराजी नाटय़ाचा नवा प्रयोग
केलाच. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मिंधेंच्या नाराज मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि भाजप युती धर्म पाळत नसल्याचे बिन आवाजाचे लवंगी फटाके फोडले. मुख्यमंत्र्यांनी म्हणे त्यांचे खास ठेवणीतले ‘फडणविसी हास्य’ करीत तिथल्या तिथे त्यांच्या फटाक्यांच्या वाती काढून घेतल्या आणि मिंधे गटाला त्यांनी केलेल्या फोडाफोडीचा आरसा दाखवला. खरे-खोटे त्या दोघांनाच माहीत, परंतु नंतर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र यासंदर्भात खास ‘भाजपाई’ खुलासा केला. ‘भाजपाई’ म्हणजे आधी गळ्यात गळे घालायचे, मग तोच गळा हळूच कापायचा आणि वर आपण काहीच न केल्याचा आव आणायचा. स्वतः मुख्यमंत्री एकीकडे महायुती अभेद्य आहे, असे सांगतात आणि दुसरीकडे युती-आघाडीचे निर्णय स्थानिक पातळीवर होतील, असा ‘भेद’ करतात. पक्षाच्या बैठकीत बोलताना ‘मित्रपक्ष आपलेच आहेत याचे भान ठेवा,’ असे उपदेशामृत पदाधिकाऱ्यांना पाजतात आणि त्याच पदाधिकाऱ्यांनी मित्रपक्ष फोडला तर त्याकडे कानाडोळाही करतात. आता मंगळवारच्या नाराजीनंतरही मिंधे गटाला चार गोष्टी सुनावत ‘आधी झाले ते झाले, इथून पुढे महायुतीमधील पक्षाचे नेते एकमेकांच्या पक्षात प्रवेश करणार नाहीत,’ अशा शब्दांत समजूत घालून त्यांची पाठवणी केली. पुन्हा हा खुलासा मुख्यमंत्र्यांनी नव्हे, तर भाजपचे मंत्री बावनकुळे यांनी केला. तो त्यांनी का केला? हा प्रश्न नाही, परंतु त्यानिमित्ताने अनेक तोंडी भाजपचा चेहरा पुन्हा एकदा समोर आला. मुळात जे स्वतःच आईच्या पाठीत खंजीर खुपसून
सत्तेसाठी दुसऱयाच्या वळचणीला
गेले आहेत त्यांना फोडफोडीवरून बोंब ठोकण्याचा, नाराजीचा राग आळवण्याचा नैतिक अधिकार आहे का? तो तुमचा तुम्हीच गमावला आहे आणि भाजपवाल्यांना हे पक्के माहीत आहे. त्यामुळेच ते आधी लचके तोडतात आणि नंतर ‘आता एवढाच, यापुढे नाही,’ असे म्हणत मलमपट्टीचे नाटक करतात. भाजपवाल्यांनी जी ‘इथून पुढे नाही’ची जी फुंकर घातली ती याच जातकुळीची आहे आणि मिंधे व त्यांच्या चेल्याचपाट्याना दुसरा पर्याय तरी कुठे आहे? तेव्हा ‘ऑपरेशन लोटस’ वगैरेच्या नावाने त्यांनी गळा काढण्यात काहीच अर्थ नाही. ‘कमळा’च्या पाण्याखाली न दिसणाऱया जाळय़ात तुम्हीच तुम्हाला आपखुशीने अडकवून घेतले आहे. ते जाळे तुमचा गळा हळूहळू आवळणारच आणि पाण्यावरील ‘कमळ’ डौलात डुलणारच. भाजपने तुम्हाला फोडले तेव्हा आनंदाने आणि सत्तालोभाने स्वतःला फोडून घेतले. आता भाजप तुमच्याही गटाचे लचके तोडतोय म्हटल्यावर बोंब मारून काय होणार? तुमच्या नाराजीची धुळवड बिनरंगाची आहे आणि प्रत्येक वेळी ही धूळ जशी उडते तशीच खाली बसते. भाजपवाल्यांच्या डोळ्यांत जराही जात नाही. तुम्ही सत्तेत जरूर आहात, पण भाजपवाले ना तुम्हाला ‘राजी’ करण्याचे कष्ट घेतात ना तुमच्या ‘नाराजी’ला भीक घालतात. मिंधे गटाने जे पेरले त्याची फळे त्यांना मिळत आहेत. त्यामुळे ‘भोगा आपल्या कर्माची फळे’ इतकेच आम्ही सांगू शकतो.
































































