पालघर साधू हत्याकांडातील आरोपीला पक्षात प्रवेश का दिला? उद्धव ठाकरे यांनी भाजपला फटकारलं

पालघरमध्ये काशीनाथ चौधरी यांना भाजपने पक्षात प्रवेश दिला. त्यावेळेला साधू हत्याकांडातील आरोपी म्हणून भाजपने बोंबाबोंब केली होती. साधू हत्याकांडात चौधरी सामील असतील तर, भाजपने प्रवेश का दिला? आणि सामील नसेल तर, प्रवेशाला स्थगिती का दिली? असं मनात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला फटकारलं आहे. दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात ज्येष्ठ शिवसैनिक कक्ष वर्धापन दिन सोहळ्यात आज उद्धव ठाकरे उपस्थिती होते. यावेळी ज्येष्ठ शिवसैनिकांना संबोधित करताना ते असं म्हणाले आहेत.

यावेळी भाषणाची सुरुवात करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “उपस्थित सर्व शिवसैनिक बांधवानो, बहिणींनो आणि मातांनो. मी मुद्दाम ज्येष्ठ हा शब्द वापरला नाही. कारण शिवसेना आणि शिवसैनिक हा कधीच म्हातारा होत नाही. आपल्याला सगळ्यांना हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण आहे. त्यांनी अनेकदा सांगितलं आहे की, माणूस वयाने थकत जातो, पण तो ज्या दिवशी मनाने थकतो, तेव्हा तो वृद्ध होतो. तुमची कोणाचीही मने थकली आहे, असं मला वाटत नाही. मने थकली असती तर आज तुम्ही येथे आलाच नसता. आज मला सर्व ज्येष्ठ शिवसैनिकांना बघून लहान झाल्यासारखं वाटत आहे. तुम्ही सगळेच शिवसैनिक एखाद्या कवचासारखे शिवसेनाप्रमुखांसोबत असायचे. तुम्ही त्यावेळी शिवसेनाप्रमुखांसोबत होता म्हणून आम्ही सर्व कुटुंब निर्धास्त असायचो.”

भाजपवर हल्लाबोल करत उद्धव ठाकरे म्हणाले, “भाजपबद्दल दसऱ्याच्या माझ्या भाषणात मी थोडं बोललो होतो. भाजप जे काही करतं ते सगळं चालून जातं. ते आम्ही खपून घ्यायचं. ते मशिदीत जाऊन नमाज पडतील. मोदींनी स्वतःच सांगितलं आहे, ईदच्या दिवशी त्यांच्या घरी सगळे जेवायला येतात. हे सगळे चाळे आपण बघायचे. मात्र आम्ही काही करायला गेलो किंवा दुसऱ्याने कोणी केलं, तर ते लव्ह जिहाद आणि भाजपने काही केलं तर ते अमर प्रेम. म्हणजे आपण त्यांना काही बोलायचं नाही.”

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “पालघरमध्ये एका व्यक्तीला (काशीनाथ चौधरी) भाजपने पक्षात प्रवेश दिला. त्यावेळेला साधू हत्याकांडातील आरोपी म्हणून भाजपने केवढी बोंबाबोंब केली होती आणि जणू ते पाप आपणच घडून आणलं आहे, अशा पद्धतीने पसरवलं. मी मुख्यमंत्री होतो, म्हणून शिवसेना हिंदुत्वाच्या विरोधात आहे, अगदी बेंबीचा देठ यांचा कुठपर्यंत गेला माहित नाही, पण तिथपासून बोंबलत होते. कारण आवाज मोठा असतो, कोणाचं देठ कुठपर्यंत असणार आपल्याला कसं कळणार. आता त्याच चौधरींना यांनी भाजपमध्ये प्रवेश दिला, मग हा हिंदुत्वाचा अपमान नाही? आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, मी तशी चौकशी केली. स्थानिक पातळीवर असं झालं. मग तुम्ही बोंबलण्याआधी चौकशी का नाही केली? अजूनही मला कळलेलं नाही की, चौधरी त्यात सामील आहेत की नाही. कारण जर साधू हत्याकांडात चौधरी सामील असतील तर, भाजपने प्रवेश का दिला? आणि सामील नसेल तर, प्रवेशाला स्थगिती का दिली? एक काहीतरी स्वीकारा. एकतर ठणठणीतपणे सांगा की, याचा काही संबंध नाही आणि संबंध नसेल तर, चौधरी, हिंदू आणि शिवसेनेची देवेंद्र फडणवीस आणि भाजपने माफी मागितली पाहिजे.”