
राज्यातील मतदार याद्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर घोळ असल्याचा पर्दाफाश महाविकास आघाडीने अनेकदा केला. दुबार नावे, चुकीचे पत्ते व फोटो तसेच बोगस मतदारांची घुसखोरी याचे पुरावेदेखील दिले. मात्र निवडणूक आयोगाने त्याची दखल घेतली नाही. आघाडीच्या नेत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही अधिकाऱयांना देता आली नाहीत. उलट निवडणूक विभागाचे प्रवत्ते असल्यासारखे भाजपचे नेते आता बाईट देत होते, मात्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीच मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ असल्याची कबुली दिली आहे. एवढेच नव्हे तर दोषींवर कारवाई करण्याची मागणीदेखील केली असून त्यावर आता भाजपचे नेते काय बोलणार, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
अंबरनाथ नगरपरिषदेची निवडणूक आठवडय़ावर येऊन ठेपली असतानाही शहरातील मतदारांच्या याद्यांमधील गोंधळ अजूनही संपलेला नाही. यासंदर्भात भाजपच्या पदाधिकाऱयांनी तक्रारी केल्या होत्या. त्याची शहानिशा केल्यानंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आज थेट अंबरनाथ नगरपरिषदेच्या कार्यालयात जाऊन तेथील निवडणूक अधिकाऱयांसोबत चर्चा केली. काही इच्छुक उमेदवारांनी आपल्याला पाहिजे असलेली नावे मतदार याद्यांमध्ये वळवून घेतली असून काही नावे अन्य प्रभागामध्ये टाकण्यात आली आहेत, असा आरोप खुद्द चव्हाण यांनी केला.


























































