
मुंबई, दिल्लीच्या विमानतळांवरून प्रवास करणे आता महाग होऊ शकते. या दोन प्रमुख विमानतळांवरील युजर्स चार्जेसमध्ये 22 पट वाढ होण्याची शक्यता आहे. टेलिकॉम डिस्प्युट सेटलमेंट अँड अपिलेट ट्रीब्युनलच्या अलीकडच्या आदेशानंतर टॅरिफ गणना पद्धती बदल झालेला आहे. या बदलामुळे युजर्स चार्जेसमध्ये वाढ होऊ शकते. 2009 ते 2014 या पाच वर्षांच्या कालावधीत एअरपोर्ट ऑपरेटर्सचे 50 हजार करोड रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. हे नुकसान प्रवाशांवर यूडीएफ, लँडिंग आणि पार्किंग फी यासारखे शुल्क आकारून भरून काढता येईल, असा आदेश आहे. यामुळे तिकिटे महाग होऊ शकतात. या निर्णयाविरोधात काही एअरलाईन्सने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर बुधवारी सुनावणी होईल.
किती वाढ होईल?
आदेशाची अंमलबजावणी झाल्यानंतर युजर डेव्हलपमेंट चार्जेस (यूडीएफ) 175 रुपयांपासून 3856 रुपये एवढे होऊ शकते, तर आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठीचे शुल्क 615 रुपयांपासून 13495 रुपये होण्याची शक्यता आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात शुल्कवाढ झाल्याने प्रवाशांची संख्या कमी होऊ शकते, अशी भीती सरकारी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.


























































