नगरपरिषद, नगर पंचायतीच्या निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; निकाल 21 डिसेंबरलाच

supreme court

राज्यातील नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा निकाल येत्या २१ डिसेंबर रोजीच जाहीर केला जाणार आहे. नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी २ डिसेंबर रोजी मतदान झाले होते.

सर्वोच्च न्यायालयाने नागपूर खंडपीठाचा निर्णय कायम ठेवत मतदानानंतर तातडीने निकाल जाहीर करण्याची याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता २ डिसेंबर आणि २० डिसेंबर या दोन दिवशी होणाऱ्या मतदानाचा निकाल एकत्रितपणे २१ डिसेंबर रोजीच जाहीर होणार हे निश्चित झाले आहे.

या प्रकरणी नुकतीच सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्यांनी २ डिसेंबर रोजी झालेल्या मतदानाचा निकाल २० डिसेंबरच्या मतदानापूर्वीच म्हणजेच २१ डिसेंबरच्या आधी जाहीर करण्याची मागणी केली होती. या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी करण्यात आली. यावेळी न्यायालयाने ही मागणी फेटाळली आणि २१ डिसेंबरच्या मतदानाचा निकाल आधी लावण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने नागपूर खंडपीठाने दिलेला निर्णय कायम ठेवला. त्यानुसार, दोन्ही टप्प्यांची मतमोजणी एकत्रितपणे होणार आहे. तसेच यावेळी न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला स्पष्ट निर्देश दिले आहेत. २० डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानात काही तांत्रिक अडचण आली किंवा ते मतदान पूर्णपणे पार पडू शकले नाही, तरीही निकालाची तारीख ही २१ डिसेंबरच असेल. ती पुढे ढकलली जाणार नाही.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बऱ्याच काळापासून प्रलंबित राहिल्याबद्दल न्यायालयाने यापूर्वीही नाराजी व्यक्त केली होती. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, या निवडणुका कोणत्याही परिस्थितीत प्रलंबित ठेवता येणार नाही आणि त्या पुढे ढकलता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निकाल २१ डिसेंबर रोजीच लागणार हे स्पष्ट झाले आहे.