अर्ज मागे घेण्यासाठी पोलिसांनी तीन उमेदवारांना उचलून एकनाथ शिंदेंच्या बंगल्यावर नेले! ठाण्यात शिवसेना-मनसेच्या उमेदवारांना धमक्या, धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज आले समोर

ठाण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या तीन उमेदवारांना माघार घेण्यासाठी पोलिसांनी उचलले आणि थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभदीप बंगल्यावर नेले. त्यानंतर त्यांनी अर्ज मागे घेतले, असा आरोप शिवसेना नेते राजन विचारे आणि मनसे नेते अविनाश जाधव यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केला. यातील विक्रांत घाग या शिवसेनेच्या उमेदवाराला पोलीस हाताला धरून नेत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजच त्यांनी पत्रकार परिषदेत दाखवले.

ठाण्यात शिंदे गटाचे सहा जण बिनविरोध निवडून आले असून ठाणे महापालिकेची निवडणूक लढवणाऱया शिवसेना व मनसेच्या अधिकृत उमेदवारांना धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला.

विक्रांत घाग यांनी किसननगर, पडवळनगर येथील प्रभाग क्रमांक 18 ड मधून शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. शिंदे गटाचे उमेदवार बिनविरोध निवडून यावेत यासाठी रात्रीपासूनच धमकी सत्र सुरू झाले होते. घाग यांना 2 जानेवारी रोजी पोलिसांनी ठाण्यातील एकनाथ शिंदे यांच्या ‘शुभदीप’ बंगल्यावर नेले. त्यानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला, असे विचारे व जाधव यांनी सांगितले. जाधव यांनी विक्रांत घाग यांना शिंदे यांच्या बंगल्यावर पोलीस बंदोबस्तात नेत असल्याचा व्हिडीओ पुरावाच दाखवला.

अधिकाऱ्यांचा मोबाईल तपासा

राजन विचारे यांनी सांगितले की, मनी व मसलचा वापर करून निवडणूक बिनविरोध करण्याचा हा प्रकार इतिहासात पहिल्यांदाच घडला असून सत्ताधाऱयांनी नवा फंडा सुरू केला आहे. शिंदे गटाचे उमेदवार बिनविरोध निवडून आणण्याचे अर्धे काम निवडणूक अधिकाऱयांनीच केले असून यासंदर्भात अधिकारी वृषाली पाटील व सत्वशिला शिंदे यांच्या मोबाईलची सखोल तपासणी केल्यास अनेक गंभीर बाबी उघड होतील. दबाव तंत्राचा वापर करून बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांना आयोगाने बाद करावे, अशी मागणीही विचारे यांनी केली.

महिला उमेदवाराला 5 कोटींची ऑफर

कोपरी येथील मनसेच्या महिला उमेदवार राजश्री नाईक यांचे पती सुनील नाईक यांना पाच कोटींची ऑफर देण्यात आली होती. ही ऑफर सत्ताधारी पक्षातील एका बडय़ा नेत्याने दिली असल्याचा आरोप अविनाश जाधव यांनी केला. तसेच मशाल चिन्हावरील एका महिला उमेदवाराच्या घरी पोलीस का गेले? त्यांच्या पतीची चौकशी का करण्यात आली? त्यांना अनेकजण रात्रभर का शोधत होते? अशा प्रश्नांची सरबत्तीच केली. साताऱयाच्या ड्रग्ज फॅक्टरीतून मिळालेला पैसा अपक्ष उमेदवारांना माघार घेण्यासाठी दिल्याचा गंभीर आरोप जाधव यांनी केला.

ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेसोबत विश्वासघात करणारे दादाभाऊ रेपाळे, स्नेहा नांगरे, विक्रांत घाग या तीन उमेदवारांसह त्यांना सहकार्य करणाऱया निवडणूक अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी राजन विचारे व अविनाश जाधव यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी श्रीनगर पोलीस ठाण्यात जाऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना लेखी निवेदन दिले आहे. या उमेदवारांना शिवसेनेच्या वतीने एबी फॉर्म देऊन उमेदवारी जाहीर केली होती. मात्र सत्ताधाऱयांनी सरकारी अधिकाऱयांना हाताशी धरून तसेच अमाप पैशांचे आमीष दाखवत उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाग पाडले. अशा चुकीच्या पायंड्यामुळे लोकशाहीवरील विश्वास उडून नागरिकांच्या भावनांचा उद्रेक होईल, असा इशाराही दिला आहे. दरम्यान याप्रकरणी निवडणूक अधिकारी वृषाली पाटील, सत्त्वशिला शिंदे यांची त्वरित बदली करून त्यांच्या जागेवर नव्या अधिकाऱयांची नियुक्ती करावी, अन्यथा निवडणूक कार्यालयावर धडक देण्याचा इशाराही मनसेने दिला आहे.