मनरेगाला उद्ध्वस्त करण्यामागे सरकारचा ठरावीक हेतू, काँग्रेस नेते राहुल गांधी यांची टीका

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर मनरेगा योजनेबाबत तीव्र टीका केली आहे. मनरेगाला उद्ध्वस्त करण्यामागे सरकारचा ठरावीक हेतू असल्याचा आरोप त्यांनी सोशल मीडियावरून केला.

राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, मोदी सरकार मजुरांकडून दैनंदिन मजुरीवर वाटाघाटी करण्याचा अधिकार हिरावून घेत आहे. तसेच ग्रामपंचायतींची स्वायत्तता कमी करून त्यांचे हात बांधले जात असून, राज्यांचे अधिकार काढून घेऊन सर्व सत्ता दिल्लीत केंद्रीत केली जात आहे, असा आरोपही त्यांनी केला.

मनरेगा योजनेमुळे किमान मजुरी, वर्षभर रोजगाराची हमी, स्वातंत्र्य आणि स्वाभिमानाने काम करण्याचा हक्क देशातील कोट्यवधी श्रमिकांना मिळाला होता. हे बदल घडवून आणण्यासाठी अनेक दशके लागली, असे राहुल गांधी यांनी नमूद केले.

मात्र आता तेच श्रमिक एकत्रितपणे सांगत आहेत की, “मनरेगामुळे आमचे जीवन बदलले होते, पण मोदी सरकार मजुरांना गुलाम बनवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे,” असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

हिंदुस्थान पुन्हा राजे-महाराजांच्या काळात ढकलण्याचा प्रयत्न सुरू असून, सर्व सत्ता आणि संपत्ती मोजक्या लोकांच्या हातात केंद्रीत करण्याचे धोरण राबवले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.