सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करा, अजित पवार यांच्या मृत्यूप्रकरणी ममता बॅनर्जी यांची मागणी

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी विमान अपघातात निधन झाल्याच्या वृत्ताने आपण अत्यंत हादरून गेलो असल्याची प्रतिक्रिया पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केली आहे. देशात राजकीय नेतेही सुरक्षित नसतील, तर सामान्य नागरिकांची अवस्था काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, दोन दिवसांपूर्वीच दुसऱ्या पक्षातील एका व्यक्तीकडून अजित पवार भाजप सोडण्यास तयार असल्याचा दावा करणारे विधान समोर आले होते आणि त्यानंतर आज ही दुर्दैवी घटना घडली. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सखोल आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली.

“आमचा विश्वास फक्त सर्वोच्च न्यायालयावर आहे. इतर सर्व तपास यंत्रणा पूर्णपणे तडजोडीत अडकल्या आहेत,” असा गंभीर आरोप ममता बॅनर्जी यांनी केला. हा देशासाठी मोठा तोटा असल्याचे नमूद करत, आज अजित पवार विरोधात असले तरी उद्या ते आपल्या पक्षाच्या मूळ प्रवाहात परतण्याच्या मार्गावर होते, असेही त्यांनी म्हटले.

या दु:खद प्रसंगी ममता बॅनर्जी यांनी अजित पवार यांच्या कुटुंबीयांप्रती, महाराष्ट्रातील जनतेप्रती तसेच शरद पवार यांच्याप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या.

>