
‘मुंबई व्याख्यानमाला’च्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी विविध सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर आपले मत व्यक्त केले. जातिव्यवस्थेच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी सांगितले की, संघात कोणत्याही जातीतला व्यक्ती सर्वोच्च पदापर्यंत पोहोचू शकतो. अनुसूचित जाती किंवा जमातीतील असणे ही अडचण नाही आणि ब्राह्मण असणे ही कोणतीही विशेष पात्रता नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
संघाच्या सुरुवातीच्या काळात ब्राह्मणांची संख्या जास्त होती, हे मान्य करतानाच संघ सर्व जातींसाठी काम करणारी संघटना असल्याचे त्यांनी सांगितले.
संघाच्या निधीबाबतही त्यांनी भूमिका स्पष्ट केली. संघाची आर्थिक व्यवस्था मुख्यतः स्वयंसेवकांच्या सहकार्यावर चालते, असे ते म्हणाले. प्रवासादरम्यान कार्यकर्ते बाहेर जेवण न करता स्वयंसेवकांच्या घरीच राहतात आणि त्यांच्या भोजनाची व्यवस्था तेच करतात, अशी माहिती त्यांनी दिली.
‘100 Years of Sangh Journey – New Horizons’ या विषयावर आयोजित कार्यक्रमात संघाची कार्यपद्धती, जातिव्यवस्था, भाषावाद, धर्मांतरण आणि बेकायदेशीर स्थलांतरित यांसारख्या विषयांवर चर्चा झाली.
भाषावादाबाबत बोलताना भागवत म्हणाले की, इंग्रजी भाषेशी आमचा वैर नाही. जिथे इंग्रजीशिवाय काम चालत नाही, तिथे इंग्रजीचा वापर केला जातो. मात्र, शक्य तितक्या आपल्या मातृभाषेचा किंवा हिंदीचा वापर करण्याचा प्रयत्न असतो.
मुस्लिमबहुल भागात काम करताना येणाऱ्या अडचणींबाबत ते म्हणाले की, अपशब्द ऐकावे लागले तरी त्याला प्रतिक्रिया देऊ नये, कारण त्यामुळे संघर्ष वाढतो असेही मोहन भागवत म्हणाले.























































