
हिंदुस्थानचा सुपरस्टार क्रिकेटपटू विराट कोहलीचा एक व्हिडीओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाला आहे. लवकरच येऊ घातलेल्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२६ साठी तो मैदानात कसून तयारी करत आहे.
विराटने स्वतः इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका रीलमध्ये तो नेट्समध्ये फलंदाजीचा कसून सराव करताना दिसत आहे.
विराटची आयपीएलमधील कामगिरी
विराटने आयपीएल इतिहासात २६७ सामन्यांच्या २५९ डावांत ८,६६१ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी ३९.५४ असून स्ट्राईक रेट १३२.८५ इतका आहे. विराटने आतापर्यंत या स्पर्धेत ८ शतके आणि ६३ अर्धशतके ठोकली आहेत. २०२५ च्या हंगामात विराटने १५ सामन्यांत ५४.७५ च्या सरासरीने ६५७ धावा कुटल्या होत्या, ज्यामध्ये त्याच्या ८ अर्धशतकांचा समावेश होता. आरसीबीला त्यांचे पहिलेवहिले आयपीएल विजेतेपद मिळवून देण्यात विराटने मोलाची भूमिका बजावली होती.
आयपीएल २०२६ चे वेळापत्रक
स्टार स्पोर्ट्सने ८ मार्च रोजी आधीच जाहीर केले आहे की, आयपीएल २०२६ चा हंगाम अधिकृतपणे २८ मार्चपासून सुरू होणार आहे. पूर्ण वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. गतविजेता आरसीबी संघ आपला किताब वाचवण्यासाठी मैदानात उतरेल. गेल्या वर्षी अहमदाबादमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात बंगळुरूने पंजाब किंग्सचा ६ धावांनी पराभव केला होता.
चिन्नास्वामी स्टेडियमवर पुन्हा परतणार क्रिकेट
कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनचे (KSCA) सचिव संतोष मेनन यांनी माहिती दिली की, एम. चिन्नास्वामी स्टेडियम आरसीबीच्या पाच घरगुती सामन्यांचे यजमानपद भूषवणार आहे. विशेष म्हणजे, आयपीएल २०२६ चा अंतिम सामना आणि एक प्ले-ऑफ सामनाही याच मैदानावर होणार आहे. आरसीबीचे उर्वरित दोन घरगुती सामने रायपूर (छत्तीसगड) येथील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवले जातील.
पंगळुरूमध्ये शोककलेनंतर उत्साहाचे वातावरण
गेल्या वर्षी जूनमध्ये आरसीबीच्या जेतेपदाच्या उत्सवादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्दैवी घटनेनंतर चिन्नास्वामी स्टेडियमवर क्रिकेट खेळवण्यास बंदी घालण्यात आली होती. यामुळे महिला विश्वचषक आणि नुकत्याच झालेल्या टी-२० विश्वचषकातील सामने या मैदानावर होऊ शकले नव्हते. आता आयपीएलच्या निमित्ताने या ऐतिहासिक मैदानावर पुन्हा क्रिकेटचे पुनरागमन होत असल्याने चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
View this post on Instagram
विराट कोहली मैदानात उतरेल तेव्हा सगळ्यांच्या नजरा त्याच्या खेळाकडे लागल्या असतील. क्रिकेट चाहत्यांना तो यंदाच्या मोसमात दमदार कामगिरी करेल अशी आशा आहे.


























































