
डोंगराळ भागात सक्रिय झालेल्या पश्चिमी विक्षोभामुळे राजधानी दिल्लीसह संपूर्ण एनसीआरच्या हवामानात सलग दुसऱ्या दिवशी मोठा बदल पाहायला मिळाला. रविवारी सकाळी दिल्ली-एनसीआरच्या अनेक भागांत जोरदार वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली, ज्यामुळे नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून जाणवणाऱ्या उष्णतेपासून मोठा दिलासा मिळाला आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) यापूर्वीच पावसाचा इशारा देत ‘यल्लो अलर्ट’ जारी केला होता. रविवारी सकाळपासूनच राजधानीत ढगाळ आकाश असून रिमझिम पावसामुळे तापमानात घट नोंदवण्यात आली आहे. दिल्लीत किमान तापमान 180.1 अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे सामान्यपेक्षा थोडे जास्त असले तरी आदल्या दिवसाच्या तुलनेत त्यात 2.3 अंशांची घट झाली आहे. पालम आणि लोधी रोड सारख्या केंद्रांवर हे तापमान 16.6 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले होते.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सोमवारपर्यंत किमान तापमान 14 ते 16 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. पावसाचा सकारात्मक परिणाम हवेच्या गुणवत्तेवरही दिसून आला आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार, दिल्लीचा सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 153 नोंदवला गेला असून तो ‘मध्यम’ श्रेणीत आहे. आयटीओ आणि दिलशाद गार्डन परिसरात हवेची गुणवत्ता ‘समाधानकारक’ पातळीवर होती. केवळ मुंडका आणि द्वारका यांसारख्या मोजक्या ठिकाणीच निर्देशांक 200 च्या पार गेला आहे.
एनसीआरमधील इतर शहरांमध्येही पावसाने सुखद वातावरण निर्माण केले आहे. ग्रेटर नोएडामध्ये रविवारी सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्ते ओले झाले असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. गुरुग्राममध्ये रात्री झालेल्या पावसामुळे तापमानात तब्बल सहा अंशांची घट झाली असून सध्या ते 21 अंशांच्या आसपास आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, कारण मार्चच्या सुरुवातीलाच वाढलेल्या कडक उन्हामुळे गव्हाचे पीक खराब होण्याची भीती व्यक्त केली जात होती. फरिदाबाद, हापूर आणि गुरुग्राममध्येही हलक्या सरी कोसळल्याने नागरिकांना उकाड्यापासून सुटका मिळाली आहे. हवामान खात्याने हरियाणात पुढील तीन दिवस पावसाची शक्यता कायम असल्याचे म्हटले आहे.


























































