
एकेकाळी देशात रुबाबदार प्रदेश म्हणून ओळख असलेल्या महाराष्ट्राचे आता सर्वत्र हासे सुरू झाले आहे. येथील राजकारणी पळून गेले आणि त्यांनी चोरून सरकार स्थापन केले, यामुळे महाराष्ट्राची प्रतिमा धुळीला मिळाली आहे. चोरून सत्तेत आलेल्या या सरकारच्या काळात सध्या काहीच समाधानकारक घडत नसल्याने जनता सत्ताधाऱ्यांना विटली आहे. त्यामुळे चोरांचे दिवस लवकरच जाणार असून पराक्रम करणाऱ्यांचे दिवस येणार आहेत, असा विश्वास शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी शनिवारी नवी मुंबईत व्यक्त केला.
शिवसेना नवी मुंबई जिल्हा शाखेच्या वतीने कोपरखैरणे येथील सेक्टर 4 ‘अ’मधील विधी बँक्वेट हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पदाधिकारी मार्गदर्शन शिबिराला शिवसेना नेते सुभाष देसाई हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले की, राज्यात सध्या सर्वत्र खेळखंडोबा आणि तमाशा सुरू आहे. त्यामुळे जे काही चालले आहे ते कुणालाच आवडत नाही. सूर्य आणि चंद्राला जसे ग्रहण लागते तसेच विचित्र दिवस सध्या राज्यात आले आहेत. त्यामुळे जनाधार सत्ताधाऱ्यांच्या पूर्णपणे विरोधात गेल्याने हे व विचित्र दिवस ज्या वेगाने आले त्याच्या दुप्पट वेगाने ते निघून जाणार आहेत. राज्यात सध्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची लाट असून या लाटेत मिंधे गटांगळ्या खाणार आहेत, असेही फटकारे शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी यावेळी सत्ताधाऱ्यांना लगावले. याप्रसंगी शिवसेना नेते-खासदार राजन विचारे, शिवसेना उपनेते विठ्ठल मोरे, शिवसेना नवी मुंबई जिल्हा संपर्कप्रमुख एम. के. मढवी, राज्य संघटक अवधेश शुक्ला आदी उपस्थित होते. मेळावा यशस्वी करण्यासाठी जिल्हाप्रमुख प्रवीण म्हात्रे, प्रकाश पाटील, जिल्हा संघटक रंजना शिंत्रे, महेश कोटीवाले, पूनम आगवणे, संदीप शर्मा, लक्ष्मीकांत कोळपकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
किंग मेकर जाग्यावरच
महाराष्ट्रात हे अनधिकृत सरकार आल्यानंतर भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ठाण्यात तीन हजार कोटींचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. हेच भ्रष्टाचाराचे पैसे किंमत लावून बोकड खरेदी करण्यासाठी वापरले जात आहेत. पैशांच्या मोहापोटी काहींनी गद्दारी केली असली तरी किंग मेकर म्हणून ओळख असलेली जनता आपल्या सोबत आहे. याच निष्टावंतांपुढे मिंधे आणि भाजपवाल्यांची तडफड होणार आहे, असा घणाघात यावेळी शिवसेना नेते-माजी खासदार राजन विचारे यांनी केला.