चंद्रपुरात पोळ्याच्या पूर्वसंध्येला शेतकऱ्याने संपवले जीवन; अतिवृष्टीने झालेले नुकसान असह्य

शेतात कीटकनाशक औषध प्राशन करून शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना चंद्रपूर जिल्हातील गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या अडेगांवात घडली. गणपत भाऊजी नागापुरे असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. नागापुरे यांच्याकडे तीन एकर शेती आहे.

दरवर्षी अतिवृष्टी आणि पुरामुळे त्यांचा शेतीचे मोठे नुकसान होत असते. यावर्षी त्यांनी तीन एकरमध्ये कापूस, धान पेरले आणि वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे त्यांची शेती पाण्याखाली आली. अद्यापही त्यांची शेती पाण्याखाली आहे. मोठ्या कष्टाने फुलविलेल्या शेतीचे डोळ्यादेखत नुकसान होताना बघणे त्यांना असह्य झाले. याच विचारातून त्यांनी शेत गाठले. शेतात असलेले कीटकनाशक प्राशन करून जीवन संपविल्याची घटना पोळ्याच्या पूर्व संध्येला घडली. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.