अ‍ॅडमिशन देताय की मंत्रिपदं देताय? अकरावी प्रवेशावरून आदित्य ठाकरे यांनी शिक्षणमंत्र्यांविरोधात आंदोलनाचा इशारा देताच पहिली यादी जाहीर

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्यातील अकरावी प्रवेशाच्या घोळावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महायुती सरकार आणि शिक्षणमंत्र्यांना धारेवर धरले. शालेय शिक्षणमंत्र्यांनी हा सगळा गोंधळ घातलेला आहे. त्यांना मुख्यमंत्री जाब विचारणार आहेत की नाही? आज जर यादी लागली नाही तर, राज्यभरात युवासेना आंदोलन करणार आणि शालेय शिक्षणमंत्री गद्दार दादा भुसे यांचा आम्ही राजीनामा मागणार, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारला दिला. आदित्य ठाकरे यांची मुंबईत मातोश्री येथे पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेतून  आंदोलनाचा इशारा देताच अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर झाली, असे आदित्य ठाकरे यांनी स्वतः ट्विट करू सांगितले.

एकंदर आपण प्रत्येक खातं पाहिले तर कुठेना कुठेतरी गडबड, गफलत आणि गोंधळ दिसत आहे. माझ्या दृष्टीकोणातून सगळ्यात मोठं खातं आणि महत्त्वाचं खातं हे शिक्षण आहे. कारण पुढची पिढी ही शिक्षणाने घडत असते. एकंदर पाहिलं तर शालेय शिक्षणमंत्री आधीचे पण जे होते त्यांनी गणवेशात जो घोळ घातला होता तो आहेच. अजूनही तो सुटला नाही अजूनही उत्तर आलेलं नाही. पण सध्याचे जे शालेय शिक्षणमंत्री आहेत त्यांनी विषयांचा घोळ घातलाच आहे, काय अनिवार्य आहे, काय नाहीये, काय मौखिक शिकवणार, काय पुस्तकी शिकवणार? हे सगळं, असे सांगत आदित्य ठाकरे यांनी शालेय शिक्षणमंत्र्यांचा गोंधळ चव्हाट्यावर आणला आहे.

ज्या दहावीच्या परीक्षेसाठी मुलं-मुली दिवसरात्र अभ्यास करतात, टेन्शन घेतात, आई-वडिलांनाही टेन्शन असतं. साधारणपणे आयुष्यतला पहिला मोठा टप्पा ही दहावीची परीक्षा असते. दहावीचे निकाल येऊन एक महिना उलटून गेला आहे. 13 मे रोजी दहावीचा निकाल लागला. जी काही सिस्टिम ‘विन्सिस’ नावाची कंपनी आहे, या कंपनीला कामाचा कुठला अनुभव आहे का? याची कुणालाच काही माहिती नाही. ऑनलाइन अॅप्लिकेशनची सिस्टिम वर्षानुवर्षे मुंबई, पुण्यात, ठाण्यात नागपूर आणि नाशिक या ठराविक शहरांमध्ये होती. अचानक या वर्षी ठरवलं गेलं की दहावीच्या नंतरचे जे एफवायजेसीचे प्रवेश मेडिकल, इंजिनीअरिंग असे सगळेच घ्या. हे त्या विन्सिसकडेच दिलं गेलं. आणि मग 21 मे रोजी पोर्टल सुरू झालं तेव्हा पहिल्याच दिवशी क्रॅश झालं. ऑनलाइन जे काही फॉर्म भरायचे होते ते क्रॅश होत होते, त्याच्यात गडबड होती. ओटीपी येणार की नाही, एसमएस येणार नाही-येणार, हा सगळा गोंधळ झाल्यानंतर 10 जूनला पहिली यादी येणार होती. पहिली यादी अजूनही आली नाही. अजूनही महाराष्ट्रातले 25 लाख विद्यार्थी हैराण आहेत, स्ट्रेसमध्ये आहेत, टेन्शनमध्ये आहेत की अॅडमिशन मिळणार की नाही मिळणार? मग सांगितलं 26 जूनला लागणार, 26 जूनलाही यादी लागली नाही. 26 जून होऊन दोन दिवस झाले. सांगताहेत आज लागेल, कदाचित 30 तारखेला लागेल किंवा पुढेही जाऊ शकतं. त्यामुळे फडणवीससाहेबांनी असे अकार्यक्षममंत्री आजूबाजूला गोळा केलेले आहेत की, जेव्हा त्यांचा पहिल्या वर्षाचा रिपोर्ट येईल तेव्हा… दहावीचे विद्यार्थी पास झालेत, पण या भाजप सरकारचं रिपोर्ट कार्ड जे येईल ते प्रत्येक खात्यात फेल… फेल… फेल… फेल… येईल. कारण नुसता गोंधळ उडवायचा. विषयावरून अजून काहीतरी दुसरीकडे विषय न्यायचा, असा सणसणीत टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.

भाषेवरून तुम्ही वाद पेटवून ठेवलेला आहे. तुम्ही पहिलीतल्या विद्यार्थ्यांवर तीन भाषा लादणार आहात, हा सगळा गोंधळ एका बाजूला. पण जे शालेय शिक्षणमंत्री आहेत ज्यांनी हा सगळा गोंधळ घातलेला आहे, त्यांना मुख्यमंत्री महोदय जाब विचारणार आहेत की नाही? कारण त्यांनी शिक्षणात घोळ घातलेलाच आहे आणि आता पुढे अॅडमिशन मिळणार की नाही? यावर मुलांचं आणि पालकांचं टेन्शन वाढत चाललं आहे. नुसते विद्यार्थी आणि पालकचं नाही तर कॉलेजचंही. कारण आता जर पहिली यादी लागणार असेल, कटऑफ कळले असेल तर पुढचं काय? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.

मराठी संपवण्यासाठी मोदी-शहांनी हिंदी सक्ती लादली अन् फडणवीस-शिंदे सरकारनं GR काढला! – संजय राऊत

13 मे रोजी निकाल लागले, आज 28 तारीख आहे. तुम्ही अॅडमिशन देताय की मंत्रिपदं देताय? स्वतःचं सरकार बनवायला तुम्हाला दीड महिना लागला होता. मंत्रिपदं द्यायला दोन महिने लागले, तसं अॅडमिशन द्यायला आता किती वेळ लागणार आहे? हा घोळ कधीना-कधीतरी सुटणार आहे की नाही? आणि नुसतं एवढचं नाही, तुम्ही बघा दरवर्षी एमपीएससीमध्ये गडबड होतेच होते. जे सरकारी कोर्सेस आहेत किंवा जिथे-जिथे सरकारचा हस्तक्षेप आहे त्यांनी कोणालातरी सिस्टिम देऊन ठेवलेली असते. जसं आधी बाकीच्या परीक्षेसाठी एम पोर्टलला देऊन ठेवलं होतं. पण ही कंपनी मंत्र्यांनी का म्हणून निवडली? अचानक कुठलाही हा प्रकार म्हणजे असा पूर्ण सिस्टिमवर लादणं कुठेहीही ड्रायरन न करता, कुठे प्रयोग न करता, तुम्ही असं सगळं लादणार असाल तर, महाराष्ट्राचं भवितव्य तुम्ही मारून टाकताय आणि हे पाप शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे करत आहेत, असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला.

आज जर यादी लागली नाही तर, राज्यभरात युवासेना आंदोलन करणार. आणि शालेय शिक्षणमंत्री गद्दार दादा भुसे यांचा आम्ही राजीनामा मागणार. काय क्षमता त्यांच्यात पाहिली आणि शालेय शिक्षण सारखं मोठं खातं त्यांना दिलं आहे? की हा युतीधर्म ते पाळताहेत? पण युतीधर्मातही तुम्ही क्षमता पाहता की नाही पाहत? हा मुख्यमंत्र्यांना सवाल आहे. मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, आंदोलन सुरू होण्यापूर्वी की, हे खातं दादा भुसेंकडून काढून घ्यावं. युतीधर्म म्हणून तुमची काही अडचण असेल तर तुम्ही नुसतं मंत्रिपद ठेवा त्यांच्याकडे पण खातं ठेवू नका. कारण ते कृषी खात्याचे मंत्री असताना देखील आम्हाला विनंती केली होती की मला खातं आवडत नाही, मला खातं बदलून द्या. मागच्या वेळेस एमएसआरडीसी त्यांच्याकडे होतं. समृद्धीचे आता काय हाल झालेत तुम्हा पाहताय. आता शिक्षण खातं दिलंय. तसेच खड्डे विद्यार्थ्यांच्या आयुष्यात पडत गेले तर याला जबाबदार भाजप आणि शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे असतील, असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी केला.