रस्ते खड्डेमुक्त झाले नाही पण यांनी खिशातले खड्डे भरून काढले, आदित्य ठाकरे यांची टीका

रविवार रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने मुंबईला झोडपून काढले आहे. मुंबईतील अनेक भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी उद्घाटन झालेली मुंबईतील अंडलग्राऊंड मेट्रो सेवेचा तर बोजवारा उडाला आहे. मेट्रो स्थानकात पाणी साचून सेवा ठप्प झाली आहे. हिंदमाता,शीव, किंग्जसर्कल, अंधेरी भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने रस्ते सेवा देखील कोलमडली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी हिंदमाता व वरळी भागातील परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजप सरकारला मुंबईच्या या परिस्थितीसाठी जबाबदार धरले. तसेच हिंदमाता परिसरात जे पंप बसवले होते ते आता तिथे का नाहीत, त्यांचे काय केले? असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी केला.

”हा काही पहिला पाऊस नाही. 5 का 6 मे ला पहिला पाऊस पडला.मागच्या आठवड्यात पडलेल्या पावसात साकीनाका, अंधेरी सब वे बंद झाला होता. तेव्हाही अनेक ठिकाणी पाणी भरलं होतं. वरळीतील मेट्रोचे दोन आठवड्यापूर्वी उद्घाटन झालं आहे. तिथे आज काय अवस्था झाली आहे. आता तिथे आत आम्हाला पाहायलाही जाऊ दिले जात नाहीए.मेट्रोने सांगितलं सांडपाणी घुसलंय, सुरक्षा भिंत तुटलीय, काहीकाम बाकी होतं असं सांगितलं. काम बाकी होतं तर मग उद्घाटन करण्याची घाई का केली? केम्प्स कॉर्नरला रस्ता खचलाय. हिंदमाता जिथे वर्षानुवर्ष पाणी तुंबायचं. 2021 साली आपण जे काम केलं.त्यानंतर गेली दोन तीन वर्ष हिंदमाता असो गांधी मार्केट असो पाणी भरलेले नाही. गेली दोन तीन वर्ष हा परिसर पूरमुक्त होता. मग नेमकं असं काय झालं की आता पुन्हा इथे पाणी भरलं. आता इथे पंपच नाहीए. इथले पंप दुसरीकडे नेले? कशासाठी हे केलं? मुंबईचे असे हाल का होतायत? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

”गेली दोन वर्ष मी रस्त्याचा घोटाळा सातत्याने समोर आणतोय. त्यावर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर बैठक झाली. पण कुठेही काही सुधारणा झाली नाही. कायम थातुरमातूर उत्तरं दिली गेली. एकंदरीत आपण पाहतोय. भाजपच्या हाती मुंबईचे हाल झाले आहेत. एकंदर मुंबईची मान्सूनची तयारी काय होती हे दिसतंय. रस्त्यांची कामं संपवा हे सांगत होतो. एसंशिंचा खोटारडेपणा लोकांसमोर समोर आला आहे. ग्रीन कार्पेट घालून नालेसफाईची पाहणी केली. कुठल्या कॉन्ट्रॅक्टरला दंड लावला. कोणाला ब्लॅकलिस्ट केलं. रस्ते खड़्डेमुक्त झाले नाही पण यांचे खिशातले खड्डे भरून काढले आहेत. मी भाजप व एसंशिंना सांगेन की फोडाफोडीचं राजकारण बंद करा आणि महाराष्ट्राकडे लक्ष द्या,असे आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारला सुनावले आहे.