
जागतिक तापमानवाढ आणि बदलत असलेले ऋतुचक्र हा जागतिक चिंतेचा विषय ठरत आहे. कार्बन उत्सर्जनामुळे वाढते प्रदूषण त्यात भर घालत आहे. कार्बन उत्सर्जनासाठी वाहने जेवढी कारणीभूत आहेत, तेवढेच एसीही कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे आता AC तापमानाबाबत नियम करण्यात येणार असून उर्जाधोरण ठरवण्यात येणार आहे, अशी घोषणा केंद्रीय उर्जामंत्री मनोहर लाल खट्टर यांनी केली आहे.
उन्हाळा असो वा इतर कोणताही ऋतू लोकांना एसी किंवा कुलर हा हवाचं. ऑफिसमध्ये 9 तास एसीमध्ये बसून घरी जाऊन सामान्य तापमानात कोणताही व्यक्ती राहू शकत नाही. त्यामुळे या उकाड्यापासून वाचण्यासाठी सगळ्य़ांच्याच घरात एसी बसवण्यात आलाय. त्यामुळे आता लोकांच्या गरजेनुसार एसीचे तापमान कमी जास्त केले जाते. मात्र यामुळे पर्यावरणावर परिणाम होत आहे. हाच पर्यावरणाचा ऱ्ह्यास कमी करण्यासाठी सरकारने एसी तापमानाची मर्यादा निश्चित केली आहे.
एसी तापमान मर्यादेबाबत लवकरच नवीन नियम जारी केले जाऊ शकतात. केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर यांनी मंगळवारी याबाबतची घोषणा केली. मनोहर लाल खट्टर यांच्या मते, एसीचे तापमान 20°C पेक्षा कमी आणि 28°C पेक्षा जास्त निश्चित करता येणार नाही. ऊर्जा सुरक्षेच्या दिशेने हे एक मोठे पाऊल असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
कोणत्याही एसीचे तापमान “20°C ते 28°C दरम्यान असणे आवश्यक आहे. त्यामुळे यासंदर्भात एक नवीन तापमान मानक निश्चित करण्यात आले आहे. म्हणजेच आता एसीचे तापमान 20°C पेक्षा कमी आणि 28°C पेक्षा जास्त होऊ शकणार नाही. हा नियम लवकरच लागू केला जाईल. नियम लागू झाल्यानंतर, परिणामांवर लक्ष ठेवले जाईल.एसीच्या वापरात एकरूपता आणण्यासाठी आणि जास्त वीज वापर कमी करण्यासाठी नवीन नियम लागू केला जाऊ शकतो, असे केंद्रीय ऊर्जा, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री खट्टर म्हणाले.
प्राथमिक अहवालानुसार अनेक घरांमध्ये आणि कार्यालयांमध्ये एसीचे तापमान 20°C पेक्षा कमी ठेवले जाते. यामुळे वीज वापर वाढतो. इतकेच नाही तर यामुळे पॉवर ग्रिडवरही अधिक दबाव येतो.ऊर्जा कार्यक्षमता ब्युरोच्या मते, एसीचे तापमान वाढल्याने वीज वापरात घट होते. जर तुम्ही एसीचे तापमान 20°C वरून 24°C पर्यंत वाढवलेतर तुम्ही 24% वीज वाचवू शकता. असे केल्याने, 1°C वाढल्याने सुमारे 6% वीज वाचू शकते. त्यामुळे पर्यावरण आणि उर्जा बचतीसाठी सरकार ही पावले उचलतं आहे.