अकरावीचे इनहाऊस कोट्यातील प्रवेश पूर्वीच्याच पद्धतीने होणार

राज्यात ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात येत असलेल्या अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात येणार आहे. इनहाऊस (संस्थांतर्गत) कोट्यातील जागांवर पूर्वीच्याच पद्धतीने प्रवेश देण्याचे निर्देश शिक्षण विभागाने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांना दिले असून, या निर्णयामुळे विद्यार्थी, पालक, संस्थाचालकांना दिलासा मिळणार आहे.

शिक्षण विभागाच्या कक्ष अधिकारी मृणाली काटेंगे यांनी परिपत्रकाद्वारे याबाबतचे निर्देश दिले आहेत. शालेय शिक्षण विभागातर्फे 2025-26 पासून उच्च माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रक्रियेद्वारे करण्यात येणार आहेत. त्याबाबत सुसूत्रता आणण्यासाठी 6 मे रोजीच्या शासन निर्णयाद्वारे कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार इनहाऊस कोट्यातील प्रवेशांबाबत बदल करण्यात आला होता. इनहाऊस कोट्यातील प्रवेशासाठी संस्थेची शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय एकाच संकुलात असणे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र या निर्णयाला संस्थाचालक, शिक्षक संघटना, पालक संघटनांनी तीव्र विरोध केला होता.

इनहाऊस कोट्याअंतर्गत खासगी व्यवस्थापनाच्या कनिष्ठ महाविद्यालयांना 10 टक्के जागा आरक्षित असतील. मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ठाणे येथे उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय संलग्नित संस्थांच्या शाळांसाठी एक युनिट ग्राह्य धरणे योग्य राहील.

राज्यातील उर्वरित जिह्यांकरिता त्याच संस्थेची शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय यासाठी महसूली जिह्यामध्ये एक युनिट इनहाऊस कोट्यासाठी ग्राह्य धरणे योग्य राहील. या अनुषंगाने आवश्यक सूचना देण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आता अकरावीच्या इनहाऊस कोट्यातील प्रवेश पूर्वीच्याच पद्धतीने होणार असल्याचे दिसून येत आहे.