मुलीच्या जन्मानंतर गावकरी लावतात 111 रोपं

राजस्थानमधील एका गावाने सामाजिक बदलाचा मोठा आदर्श निर्माण केला आहे. राजसमंद जिह्यातील पिपलांत्री असे या गावाचे नाव असून त्याची कहाणी प्रेरणादायी आहे. मुलगी जन्माला आल्यानंतर पिपलांत्री गावात 111 देशी झाडे लावली जातात. पर्यावरणाबरोबरच मुलींचे संगोपन आणि संरक्षण करण्याची प्रतिज्ञा यानिमित्ताने घेतली जाते. आतापर्यंत चार लाखांहून अधिक झाडे या गावाने जगवली आणि ओसाड जमिनीवर हिरवे रान फुलवले. गावकऱ्यांनी श्रमदानातून कडुलिंब, शिसम, आंबा, वड, पिंपळ यांसारखी अनेक झाडे जगवली. राजस्थानच्या कोरडय़ा जागेचे वसलेले गाव हरित झाले. गावात 111 झाडे लावण्याची प्रथा निरंतर सुरूच असून प्रत्येक रक्षाबंधनाला येथे पर्यावरणाचा अनोखा उत्सव जल्लोषात साजरा करण्यात येतो. पिपलांत्री गावाचे सरपंच डॉ. श्याम सुंदर पालिवाल यांनी या मोहिमेला सुरुवात केली.