
अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान कोसळून मोठी दुर्घटना घडली. अहमदाबादमधील या दुर्घटनेत विमानतील सर्वच्या सर्व 242 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, अद्याप केंद्र किंवा गुजरात सरकारकडून मृतांची कुठलीही अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही.
अहमदाबादमध्ये आज दुपारी विमान कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत विमानातील 242 जणांपैकी एकहीजण वाचला नाही. अहमदाबादच्या पोलीस प्रमुखांनी म्हणजेच पोलीस आयुक्तांनी ही माहिती दिल्याचे वृत्त AP या वृत्त संस्थेने दिले आहे. तर काही जखमी प्रवाशांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पण त्यांचं वाचणं कठीण दिसतंय, असे अहमदाबादचे पोलीस आयुक्त जी. एस. मलिक म्हणाले. इंडिया टुडेने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
अहमदाबादमध्ये कोसळलेल्या विमानात 169 हिंदुस्थानी, 53 ब्रिटिश, 7 पोर्तुगाल आणि 1 कॅनडाचा नागरीक होते. विमान अपघातापूर्वी पायलटने मदत हवी, असा मेसेज दिला होता, असे नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांनी सांगितले.