अलिबागचा हापूस मुंबईच्या बाजारात, एपीएमसी मार्केटमध्ये पहिली पेटी दाखल

कोकणच्या मातीतून आलेला आणि चवीसाठी ओळखला जाणारा अलिबागचा हापूस अखेर मुंबईच्या बाजारात आला आहे. अलिबाग तालुक्यातील केतकीचा मळा येथील आंबा उत्पादक गौरव पाटील यांच्या बागेतील हापूसच्या दोन पेट्या नवी मुंबई एपीएमसीत दाखल झाल्या. अलिबागचा आंबा स्थानिक ग्राहकांबरोबरच पर्यटकांच्या विशेष पसंतीचा आहे. वाशी एपीएमसीमार्फत हापूस देश-विदेशातही पोहोचतो.

अलिबाग तालुक्यातील आंब्याला मोठी मागणी असते. भातशेतीसोबत आंबा लागवडीकडे अलिबागच्या शेतकऱ्यांचा कल वाढत असून तरुण शेतकरी आधुनिक पद्धतीने आंबा शेतीकडे वळत आहेत. यंदा पावसाने ऑक्टोबर अखेरपर्यंत हजेरी लावल्याने आंबा पिकासमोर अनेक अडचणी होत्या. मात्र कृषी अधिकाऱ्यांच्य मार्गदर्शनाखाली योग्य वेळी फवारणी व आंब्याचे झाड सुरक्षित राहिले. कठीण हवामानातही गौरव पाटील यांनी घेतलेल्या मेहनतीचे फळ म्हणजेच यंदाच्या हंगामातील पहिली आंब्याची पेटी बाजारात दाखल झाली.

यंदा पाऊस लांबणीवर गेल्याने मोठे आव्हान होते. तरीही योग्य देखभाल आणि मेहनतीमुळे आंबा लवकर तयार झाला. या हंगामातील पहिली हापूसची पेटी वाशी एपीएमसीला पाठवता आली, याचा आनंद आहे, असे गौरव पाटील, आंबा उत्पादक यांनी सांगितले.