
‘ऑपरेशन सिंदूर’ ही नव्या हिंदुस्थानची ओळख आहे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या मोहिमेसाठी मोदींचे कौतुकच केले असते, अशी बढाई गृहमंत्री अमित शहा यांनी आज नांदेड येथे झालेल्या सभेत मारली. त्यांच्या या वक्तव्यावर बोलताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्यांना जोरदार टोला लगावला. ”शिवसेनेची लांडगेतोड करणाऱ्याला कधीच दारात उभं केलं नसतं”, असा सणसणीत टोला अंबादास दानवे यांनी लगावला. अंबादास दानवे यांनी ट्विटर करत गृहमंत्र्यांना चांगलेच सुनावले.
”नांदेडला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ऑपरेशन सिंदूरसाठी मोदींची गळाभेट घेतली असती. मात्र त्यांनी काय केलं असतं हे आम्ही शिवसैनिक जास्त चांगलं सांगू शकतो. अगोदर, त्यांनी शिवसेनेची लांडगेतोड करणाऱ्याला कधीच दारात उभं केलं नसतं, गळाभेट लांबच. धर्म विचारून हिंदूंचे प्राण घेणारे ‘ते हल्लेखोर अतिरेकी’ कुठे आहेत, हा सवाल त्यांनी केला असता. त्यांनी हे ही विचारले असते की, ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने सगळा देश सोबत उभा असताना, कोणाच्या दबावाखाली पाकिस्तानशी शस्त्रसंधी घोषित करण्यात आली? असे अंबादास दानवे यांनी ट्विट केले आहे.
”दुसरीकडे, आज मराठवाड्यावर विशेष प्रेमाचा देखावा करताना त्यांनी मराठवाडा वॉटर ग्रीडचा उल्लेख केला.या योजनेच्या कागदांचा गठ्ठा मंजुरीसाठी आपल्या केंद्र सरकारकडे पाठवल्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. त्याचं पुढे काय झालं, हे मात्र शाह सांगायला विसरले.. हे कोकण आणि कृष्णा खोऱ्याचे पाणी मराठवाड्याला देणार हे भाजप 10 वर्षांपासून सांगते आहे. अजून तरी एकही थेंब मराठवाड्यात आलेला नाही! तसेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे नाव घेऊन आपण भाषण सुरू केले खरे मात्र चिकलठाणा विमानतळाला त्यांचे नाव देण्याची फाईल अंतिम मंजुरीची वाट पाहत अजून केंद्राकडे धूळखात पडली आहे, याचीही आठवण अंबादास दानवे यांनी शहांना ट्विटरवरून करून दिली.