
>> आकाश महालपुरे
शिक्षण हा तिसरा डोळा असून व्यवस्थेत परिवर्तन करण्याचे प्रभावी माध्यम आहे. शिक्षण नैतिकता शिकविते अन् तिचे अधःपतन रोखणारी ती अनैसर्गिक धमनी आहे. मात्र आता त्याच शिक्षणाचे व्यापारीकरण झाले. देशभरातील अनेक ठिकाणांहून विद्यार्थी वर्गाच्या मन विषण्ण करणाऱया अनेक बातम्या दररोज येत असतात. ताज्या घटनाक्रमात उत्कर्ष महादेव शिंगणे नामक विद्यार्थ्याने शैक्षणिक दबावामुळे जीवनयात्रा संपवल्याची बातमी आली. मनात अनेक विचारांनी दैना झाली. आतापर्यंत आठ महिन्यांत 22 मुला-मुलांनी आत्महत्या केल्या. आयुष्यात काहीतरी बनायचे हे सोनेरी स्वप्न आणि त्यासाठीच्या अंतहीन अपेक्षांचे ओझे पाठीवर घेऊन वावरणाऱया विद्यार्थी-विद्यार्थिनींची दुरवस्था केवळ कोटा येथेच नाही, तर संपूर्ण देशभरात दिसून येत आहे. बोर्डाच्या परीक्षांचे निकाल लागल्यानंतर दरवर्षी अशा वेदनादायक घटनांची पुनरावृत्ती होते आहे.
प्रवेशपूर्व परीक्षा आणि पुढे शिष्यवृत्ती अशा लागोपाठ काही परीक्षांचे आमिष विद्यार्थी अन् पालकांना वृत्तपत्रांत दाखवून खासगी क्लासचे किती विद्यार्थी डॉक्टर आणि इंजीनिअर झाले याच्या पानभर जाहिराती स्थानिक वृत्तपत्रांतून दररोज भेटीला येत आहेत. जाहिरातींचा एवढा मारा होत आहे की, इच्छा नसताना मुले अन् पालकांना त्याची भुरळ पडते. पालकांचे पाय आपोआप क्लासकडे वळायला लागले आहेत. पालक म्हणजे तातडीचा गरजवंत असल्याचे मानून त्याला लाखो रुपयांचे पॅकेज दाखवून सुलभ हप्त्याने कापण्याचे सोपस्कार कोचिंग क्लासवाल्यांनी सुरू केले आहेत.
समाजात शिक्षणाचे प्रमाण कमी होते तेव्हा समाजसुधारकांना त्याची चिंता वाटायची. महात्मा फुले यांना तर असे वाटत होते की, सगळे अनर्थ एका अविद्येने केले. शिक्षण नाही म्हणून समाजात सगळे अनर्थ घडतात. त्यासाठी प्रत्येकाने शिकले पाहिजे असे त्यांना वाटत होते. त्यासाठी त्यांनी आणि सावित्रीबाई यांनी अथक परिश्रम घेऊन शिक्षणावर मोठे काम केले.सावित्रीबाईंनी स्त्रियांसाठी पहिली शाळा पुण्यात काढून स्त्राr शिक्षणाची मुहूर्तमेढ केली म्हणून आजच्या काळात आमच्या मुली,भगिनी घराबाहेर पडल्या आणि शिक्षण घ्यायला लागल्या. मात्र शिक्षितांना विद्या म्हणजे केवळ शिक्षण,उच्च शिक्षण असे वाटले. त्यामुळे सगळा समाज शिक्षित झाला, परंतु विचार आणि मेंदूचा वापर कमी झाला. पूर्वी व्यक्ती कमी शिकलेली किंवा अडाणी असे. मात्र विविध अंगांनी विचार करीत होती. आता सगळ्यांच्या जवळ विद्या आली, पण तिने मेंदूंना फारशी चालना मिळाली नाही. त्यातून विद्यार्थीही सुटलेले नाहीत आणि त्यांच्या आत्महत्याही.
सुख आणि दुःख या आयुष्याच्या पायऱया आहेत.सुख आले म्हणून जगावं आणि दुःख आले म्हणून मरावं असं नसतं. बाहेर पडा,नीट बघा. निसर्गाच्या सान्निध्यात किती आनंद आहे? किती शक्ती आहे? तो तुम्हाला जगण्याची उमेद देईल, पानाफुलांना मिठीत घेणारे ते ढग, पहाटे पहाटे दवबिंदूंचा पडलेला सडा,ती एक पायवाट, रस्ता. हा कधीच संपणार नाही आणि जगात असा कोणताच रस्ता नाही की, जो कुठे पोहोचवणार नाही. प्रत्येक रस्ता हा त्याच्या ठिकाणापर्यंत नेतच असतो. आपण फक्त संयम ठेवून चालत जायचं काम करायचं असतं. अपेक्षांचे ओझे असह्य झालेल्या विद्यार्थ्यांनी याचा विचार करायला हवा. त्याच वेळी पालकांनीही आपल्या पाल्यांना अंतहीन अपेक्षांचे बळी बनवायचे का? या प्रश्नाचे उत्तर द्यायला हवे.