
अरुणाचल प्रदेशमधील, पण सध्या यूकेची रहिवासी असलेल्या एका हिंदुस्थानी वंशाच्या महिलेने शांघाय विमानतळावरील चिनी इमिग्रेशन अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. ट्रान्झिट दरम्यान तिचा हिंदुस्थानी पासपोर्ट स्वीकारण्यास नकार देऊन तिला अनेक तास ताब्यात ठेवल्याचा आणि तिचा छळ केल्याचा आरोप तिने केला आहे.
पेमा वांगजोम थोंगडोक या २१ नोव्हेंबर रोजी लंडनहून जपानला प्रवास करत होत्या. शांघाय पुडोंग विमानतळावर त्यांना तीन तास थांबावे लागणार होते. त्यांनी आरोप केला आहे की, इमिग्रेशन काउंटरवरील अधिकाऱ्यांनी त्यांचा पासपोर्ट ‘अवैध’ घोषित केला, कारण त्यात त्यांचे जन्म ठिकाण ‘अरुणाचल प्रदेश’ असे नमूद होते. अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले की, ‘अरुणाचल प्रदेश चीनचा भाग आहे.’
‘इंडिया टुडे’ने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे. यात संबंधित महिलेची बाजू मांडताना म्हटले आहे की, ‘इमिग्रेशननंतर मी माझा पासपोर्ट जमा केला आणि सुरक्षा तपासणीसाठी थांबले. तेवढ्यात एक अधिकारी आली आणि माझे नाव घेऊन ‘इंडिया, इंडिया’ असे ओरडत मला बाजूला काढले. मी कारण विचारले असता, त्यांनी मला इमिग्रेशन डेस्कवर नेले आणि हा व्हॅलिड पासपोर्ट नाही’ असे सांगितले.
जेव्हा त्यांनी पासपोर्ट अवैध असण्याचे कारण विचारले, तेव्हा अधिकाऱ्याने उत्तर दिले, ‘अरुणाचल हा चीनचा भाग आहे. तुमचा पासपोर्ट अवैध आहे.’
पेमा या उत्तरामुळे त्या गोंधळून गेल्याचे म्हणाल्या. त्यांनी आठवण करून दिली की गेल्या वर्षी त्यांचा शांघायमधून ट्रान्झिट सुरळीत झाला होता आणि लंडनमधील चिनी दूतावासातूनही त्यांनी हिंदुस्थानींना कोणतीही अडचण येणार नाही हे निश्चित केले होते.
याव्यतिरिक्त, पेमा यांनी आरोप केला आहे की अनेक इमिग्रेशन कर्मचाऱ्यांनी आणि चायना ईस्टर्न एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्यांनी त्यांची खिल्ली उडवली, त्यांच्यावर हसले आणि त्यांना ‘चिनी पासपोर्टसाठी अर्ज करा’ असेही सुचवले. या सगळ्या प्रकारामुळे छोटासा थांबा १८ तासांच्या थांब्यात रुपांतर झाले. या काळात त्यांना कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आली नाही. चांगले जेवण किंवा विमानतळ सुविधांचा वापर देखील नाकारण्यात आला, असा दावा त्यांनी केला आहे.
पेमा यांनी पुढे आरोप केला की, त्यांचा व्हिसा वैध असूनही त्यांना जपानच्या पुढील विमानाने प्रवास करण्यापासून रोखण्यात आले आणि त्यांचा पासपोर्टही ताब्यात ठेवण्यात आला. ट्रान्झिट क्षेत्रात बंदिस्त असल्याने त्यांना तिकीट पुन्हा बुक करता आले नाही, जेवण विकत घेता आले नाही किंवा टर्मिनलमध्ये फिरता आले नाही.
अधिकाऱ्यांनी त्यांना केवळ चायना ईस्टर्न एअरलाईनचे नवीन तिकीट खरेदी करण्यासाठी दबाव आणला आणि तसे केल्यावरच पासपोर्ट परत मिळेल, असे सूचित केले. यामुळे त्यांचे विमान सुटले व हॉटेल बुकिंगचे आर्थिक नुकसान झाले.
शेवटी, यूकेमधील एका मित्राद्वारे त्यांनी शांघायमधील हिंदुस्थानी वाणिज्य दूतावासाशी संपर्क साधला. त्यानंतर हिंदुस्थानी अधिकाऱ्यांनी त्यांना एस्कॉर्ट केले आणि शांघायमधून निघणाऱ्या रात्री उशिराच्या विमानात नेले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवलेल्या पत्रात पेमा यांनी, त्यांच्यासोबत झालेली ही वागणूक म्हणजे ‘हिंदुस्थानच्या सार्वभौमत्वाचा आणि अरुणाचल प्रदेशच्या नागरिकांचा थेट अपमान’ असल्याचे म्हटले आहे.
त्यांनी हिंदुस्थान सरकारला हा मुद्दा बीजिंगकडे उचलून धरण्याची, संबंधित इमिग्रेशन आणि एअरलाईन कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून शिस्तभंगाची कारवाई करण्याची आणि नुकसान भरपाईची मागणी करण्याची विनंती केली आहे. तसेच, भविष्यात आंतरराष्ट्रीय प्रवासादरम्यान अरुणाचल प्रदेशमधील हिंदुस्थानींना अशा अडथळ्यांचा सामना करावा लागणार नाही, अशी ग्वाही देण्याचीही त्यांनी मागणी केली आहे.























































