अख्खा पक्षच भाजपमध्ये विलिन करण्याचं षडयंत्र रचलं जातंय; बीआरएसमध्ये उभी फूट, ताई-दादात घमासान

तेलंगणामध्ये सलग दोन वेळा सरकार स्थापन करणाऱ्या भारत राष्ट्र समितीमध्ये (बीआरएस) उभी फूट पडली आहे. बीआरएसच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या आमदार के. कविता यांनी गुरुवारी त्यांचा भाऊ आणि पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष केटी रामाराव यांच्यावर गंभीर आरोप केला. के. टी. आर आपल्याला पक्षापासून वेगळे करण्याचा आणि अख्खा पक्षच भारतीय जनता पक्षामध्ये विलिन करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप के. कविता यांनी केला. यामुळे तेलंगणाच्या राजकारणामध्ये प्रचंड खळबळ उडाली.

के कविता यांनी आपले वडील आणि बीआरएस पक्षाचे प्रमुख के. चंद्रशेखर राव यांना एक पत्र लिहिले होते. या पत्रामध्ये त्यांनी पक्ष आतूनच कमकुवत करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे म्हटले होते. मात्र वडिलांना लिहिलेले हे पत्र काही लोकांनी जाणूनबुजून जगजाहीर केले. यामुळे के. कविता यांच्या संतापाचा कडेलोट झाला. तसेच पक्ष भाजलमध्ये विलिन करण्याचे षडयंत्र सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.

दिल्लीतील कथित दारू घोटाळ्या प्रकरणी तुरुंगात होते तेव्हा बीआरएस भाजपमध्ये विलिन करण्याच्या हालचाली सुरू होत्या. पण मी याचा कडाडून विरोध केला. पक्ष वाचवण्यासाठी मी आणखी एक वर्ष तुरुंगात काढण्यासही तयार होते. धोका देणे माझ्या रक्तात नसल्याचे के. कविता म्हणाल्या. यावेळी त्यांनी पक्ष नेतृत्वावरही हल्ला चढवला. उल्लेख न करता त्यांनी के.टी. रामाराव यांच्यावर निशाणा साधला.

त्या पुढे म्हणाल्या की, केसीआर देवमाणूस आहेत. पण त्यांच्या आजूबाजूला काही राक्षसांसारखे लोक असून ते त्यांना नुकसान पोहोचवत आहेत. मी केसीआर यांची मुलगी आहे. माझेच पत्र लीक होऊ शकते, तर काही लोकांच्या परिस्थितीचा अंदाज तुम्ही बांधू शकता.