समुद्रकिनाऱ्यावर वाहन चालविण्यास बंदी; पोलिसांकडून दगड, चिरे, झाप, लाकडे गोळा करून बॅरिकेडिंग

सुमद्रकिनाऱ्यावर वाहने घेऊन जाणाऱ्या पर्यटकांना शिस्त लावण्यास जिल्हा प्रशासन आणि स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन अपयशी ठरले असल्यामुळे आता पोलिसांनी ही जबाबदारी खांद्यावर घेतली आहे. किनाऱ्याच्या आजूबाजूला मिळेल ते साहित्य वापरून समुद्रकिनाऱ्यावर जाणारे रस्ते बंद करण्याची मोहीम पोलिसांनी हाती घेतली आहे. दापोली तालुक्यातील मुरुड, कर्डे, रत्नागिरी तालुक्यातील जयगड, भाट्ये, आरेवारे, गणपतीपुळे आणि काजीरभाटी किनारे पोलिसांनी दगड, चिरे, माड, झाप आणि लाकडे गोळा करून बंद केले आहेत.

पोलिसांनी किनाऱ्यावर वाहन चालवताना आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला असून समुद्र किनाऱ्यावर कुणी वाहन चालवत असेल तर 112 ला फोन करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. पर्यटनातून ग्रामपंचायतींना महसूल मिळतो. काही ठिकाणी पार्ंकग शुल्कही आकारले जाते. मात्र, वाहने किनाऱ्यावर जाऊ नये याकरिता उपाययोजना केली जात नाही. मात्र पोलिसांनी निधी नाही म्हणून न थांबता इच्छाशक्ती असेल तर काहीही शक्य होऊ शकते, असा धडा यातून दिला आहे.

समुद्र किनाऱ्यावर आहे त्या गोष्टींचा वापर करून बॅरिकेंडिंग केले पाहिजे. ग्राम पंचायत, जिल्हा परिषद, पर्यटन विकास महामंडळ यांच्याकडून ते व्हायला हवे. केवळ तात्पुरती व्यवस्था असून चालणार नाही तर व्यवस्थित पक्की बांधणी व्हायला हवी. परंतु रत्नागिरी पोलीस, पोलीस पाटील व गावकरी मिळून हे काम करत आहेत. आम्ही आहे त्या गोष्टींचा वापर करून तात्पुरती बॅरिकेडिंग करून घेत आहोत. नियमांचे उल्लंघन करणाऱयांविरोधात कारवाईही केली जात आहे.  – नितीन बगाटे, जिल्हा पोलीस अधीक्षक, रत्नागिरी