
मुंबईकरांची दुसरी जीवनवाहिनी असलेल्या बेस्टला तिकीट भाडेवाढीचा झटका बसला आहे. बेस्टने 9 मे रोजी भाडेवाढ लागू केल्यानंतर पुढील महिनाभरात दैनंदिन प्रवासी संख्या तब्बल अडीच लाखांनी घटली आहे. तिकीट भाडेवाढीमुळे प्रवाशांनी पाठ फिरवली आहे. त्यात वेटलिजच्या पुरेशा बसेस रस्त्यावर धावत नाहीत. त्यामुळे बसफेऱ्यांचे प्रमाण कमी झाल्याने प्रवासी संख्येत आणखी घसरण होण्याची शक्यता आहे.
आर्थिक घडी सावरण्यासाठी बेस्ट उपक्रमाने सात वर्षांनंतर पहिल्यांदा 9 मे रोजी तिकीटदरात वाढ केली. साध्या बससाठी पहिल्या पाच किमीच्या टप्प्यात 5 रुपयांऐवजी 10 रुपये, तर वातानुकूलित बससाठी पहिल्या पाच किमीसाठी 6 रुपयांऐवजी 12 रुपये अशी तिकीट दरवाढ करण्यात आली. या तिकीट दरवाढीने बेस्टच्या तिजोरीत दुप्पट वाढ झाली. मात्र प्रवासी संख्येत मोठी घट होऊ लागल्याने बेस्टच्या अस्तित्वाबाबत गंभीर चिंता व्यक्त होत आहे. बेस्टच्या अनेक मार्गांवर शेअर रिक्षावालेही बेस्टच्या तिकिटाइतकेच पैसे घेतात. त्यामुळे बस वेळेवर येत नसल्याने बेस्टचे प्रवासी रिक्षाकडे वळत आहेत. बेस्टची भाडेवाढ आणि वेळेत बस न येणे ही प्रवासी कमी होण्यामागील प्रमुख कारणे असल्याचे जाणकारांचे मत आहे.
प्रवासी संख्येतील घसरण
1 मे ते 8 मे (भाडेवाढीपूर्वी)
23 लाख 96 प्रवासी
9 मे ते 25 जून (भाडेवाढीनंतर)
20 लाख 54 हजार प्रवासी
नोव्हेंबरपर्यंत स्वमालकीच्या 200 बसेस भंगारात जाणार
बेस्टच्या ताफ्यात सध्या अडीच हजारांच्या आसपास बस उरल्या आहेत. त्यात बेस्टच्या स्वमालकीच्या बसेसची संख्या 430 आहे, तर वेटलिजच्या बसेस 2,187 आहेत. स्वमालकीच्या बसेसपैकी 200 बसेस नोव्हेंबरपर्यंत भंगारात जाणार आहेत. तसेच 248 बसेसचे आर्युमान 2032 पर्यंत आहे. बेस्टच्या स्वमालकीच्या बसेस भंगारात निघण्याचे प्रमाण अधिक असल्याने त्याचा बससेवेवर मोठा परिणाम झाला आहे. वेटलिज कंपन्यांकडून बसेसचे योग्य नियोजन केले जात नसल्यामुळे मुंबईकरांचा बसच्या प्रतीक्षेत वेळ वाया जात आहे.
अनेकदा दीड तास रांगेत उभे राहिल्यानंतर बस येते. तो त्रास सहन करण्यापेक्षा आम्ही तीन प्रवासी एकत्र येऊन प्रत्येकी 20 रुपये देतो आणि शेअरिंग ऑटोने घरी जातो, असे गोरेगाव येथील प्रवासी कैलास नांगरे यांनी सांगितले. मी दररोज कांदिवलीतील ठाकूर व्हिलेज ते दिंडोशी प्रवास करतो. एका कंपनीत क्लिनर म्हणून काम करतो. एक-दोन रुपयांची भाडेवाढ केली असती तर बरे झाले असते. बेस्टचे प्रवासी घटले नसते. बेस्टने याचा विचार करून तिकीट दर कमी करावा, असे कांदिवली येथील प्रवासी मंजू गुप्ता म्हणाले. भाडेवाढ योग्य आहे. मात्र प्रत्येक मार्गावर पुरेशा बस सोडाव्यात आणि बस थांब्यांवर येणाऱ्या बसेसची आगाऊ माहिती द्यावी. बसमध्येही थांब्यांची माहिती देणारे इंडिकेटर लावावेत, असे मालाड येथील प्रवासी दिलीप चावडा यांनी सुचवले.