
एकीकडे 15 दिवस आधीच दाखल झालेल्या पावसाने पहिल्याच दिवशी मुंबईसह ठाणे, रायगड जिल्ह्याला झोडपून काढले असतानाच हा पाऊस ठाणे जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात मात्र कोसळलाच नाही. तरीदेखील यंदा ठाणेकरांना काळजी करण्याचे कारण नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत सध्या भातसा धरणात 33 टक्के तर बारवी धरणात 36 टक्के जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे ठाणेकरांनो, 8 ऑगस्टपर्यंत पाण्याचे टेन्शन घेऊ नका, असे जलसंपदा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
15 वर्षांनंतर यंदा पावसाने वेळेआधीच राज्यभरात दमदार हजेरी लावली. पहिल्याच दिवशी मुंबई, रायगड तसेच ठाणे शहरात पावसाने तुफान बॅटिंग केली आहे. असे असले तरी मुंबई आणि ठाण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात मात्र पावसाचा जोर वाढलेला नाही. या भागात आतापर्यंत जवळपास अवघा 8 ते 9 मिलीमीटर पाऊस पडला आहे. सध्या भातसा धरणात 314.671 तर बारवी धरणात 122.45 दशलक्ष जलसाठा आहे. मागील वर्षी याचदिवशी भातसात 262.64 तर बारावीमध्ये 100.53 पाणीसाठी होता.
धरणे लवकरच ओव्हरफ्लो
गेल्या वर्षी भातसा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला होता. भातसा धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 792.62 दशलक्ष घनमीटर आहे. हे धरण मुंबई आणि ठाणे शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असून यंदादेखील धरणे लवकरच ओव्हरफ्लो होतील, असा विश्वास जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
चांगला पाऊस पडण्याची शक्यता
मे महिना सुरू असूनही पाणी पुरेल एवढा धरणात पाणीसाठा आहे. त्यामुळे सध्या तरी पाणी कपातीचे संकट नाही. दरम्यान पावसाची पुढील स्थिती बघूनच निर्णय घेण्यात येईल. तसेच यंदा जिल्ह्यामध्ये धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ होईल.
गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक साठा
बारवी धरणातून ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, मीरा-भाईंदर, भिवंडी आणि नवी मुंबईला आणि आजूबाजूच्या परिसराला पाणीपुरवठा केला जातो. बारवी धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता 338.84 दशलक्ष लिटर असून यंदा 122.45 जलसाठा आहे. तर मागील वर्षी याचदिवशी हाच 100.53 दशलक्ष घनमीटर म्हणजेच 29 टक्के जलसाठा होता. मात्र यंदा 36.13 टक्के जलसाठा उपलब्ध आहे.