
ऑपरेशन सिंदूरला एक महिना पूर्ण होण्या्च्या पार्श्वभूमीवर तसेच मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मला एक वर्ष पूर्ण होणार असल्याने भाजपकडून देशभरात घरात घरात जाऊन सिंदूर वाटले जाणार होते. भाजपकडून हे कॅम्पेन राबण्यात येणार असल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यावरून मोदी सरकारवर टीकाही झाली.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेतूनही या कॅम्पेनवर जोरदार टीका केली. तसेच मोदीजी त्यांच्या पत्नीला सिंदूर कधी देणार, असा बोचरा सवाल त्यांनी केला. तसेच इतर विरोधी पक्षांनी देखील भाजपच्या या कॅम्पेनवर सडकून टीका केल्यानंतर जनतेतूनही भाजपच्या या सिंदूर कॅम्पेनवर टीका होऊ लागली.
जनतेने टीका केल्यानंतर आता भाजपने याबाबत यूटर्न घेतला असून आम्ही असे कोणत्याही प्रकारचे कॅम्पेन करणार नसल्याचे भाजपने सांगितले आहे. भाजपचे नेते अमित मालवीय यांनी हे भाजपला ट्रोल करण्यासाठी अफवा पसरवल्याचा दावा केला आहे.