सरकार 227 प्रभागांवर ठाम, नव्या प्रभाग रचनेमुळे कोट्यवधीचा भुर्दंड, शेकडो कर्मचारी पुन्हा राबणार

>> देवेंद्र भगत

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात 236 प्रभागांनुसार आरक्षण लॉटरीसह मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असताना आता महायुती सरकार मात्र 227 प्रभागांनुसारच निवडणूक घेण्यावर ठाम आहे. त्यामुळे मतदार याद्या, प्रभाग रचना आणि आरक्षण लॉटरी जाहीर करणे आणि त्यावर हरकती-सूचना मागवणे, सुनावणी घेणे अशा सर्व प्रक्रिया नव्याने कराव्या लागणार असल्याने पालिकेला कोटय़वधी रुपयांचा पुन्हा भुर्दंड पडणार असून शेकडो कर्मचाऱयांनाही पुन्हा राबावे लागणार आहे.

मुंबई महानगरपालिकेची 2012 आणि 2017 ची निवडणूक 2011च्या जनगणनेनुसार झाली, मात्र 2011 नंतर मुंबईच्या लोकसंख्येत सुमारे नऊ लाखांची वाढ झाली. त्यामुळे प्रशासकीय कामाच्या सोयीसाठी पालिकेने प्रभागांची संख्या नऊने वाढवली. मात्र आता पुन्हा नऊ वॉर्ड कमी करून विभागणी केलेली वाढीव लोकसंख्या 227 वॉर्डमध्ये समावेश करावी लागणार आहे. परिणामी नऊ वॉर्ड वाढल्यामुळे बदललेल्या वॉर्डनुसार मतदारांचा मतदानाचा वॉर्ड पुन्हा एकदा बदलणार आहे.

अशी होणार नव्याने प्रक्रिया

– 2017 निवडणुकीमध्ये मुंबई महानगरपालिकेन निवडून आलेल्या नगरसेवकांची मुदत 7 मार्च 2022 रोजी संपल्यानंतर निवडणूक होण्याच्या शक्यतेमुळे पालिकेच्या माध्यमातून दोन वर्षांपूर्वी मतदार याद्या जाहीर करणे, आरक्षण लॉटरी, प्रभाग रचना यावर हरकती-सूचना अशी संपूर्ण प्रक्रिया राबवण्यात आली.
– यामध्ये ही संपूर्ण प्रक्रिया एकदा राबवण्यासाठी किमान 300 कर्मचाऱयांचे मनुष्यबळ आणि 50 ते 75 लाखांचा खर्च आणि पालिकेच्या कर्मचाऱयांवर कामाचा भार येतो. मात्र ही प्रक्रिया दोन वेळा पार पडली असून आता पुन्हा 227 नुसार संपूर्ण प्रक्रिया करावी लागल्यास पालिकेला पुन्हा आर्थिक भुर्दंड आणि मनुष्यबळाची मेहनत करावी लागणार आहे.

पूर्वतयारी पूर्ण

दरम्यान, मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्व प्रकारची तयारी झाली असल्याची माहिती राज्याच्या निवडणूक विभागाकडून देण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय आल्यास अवघ्या दोनच दिवसांत निवडणूक प्रक्रिया सुरू करता येईल. यानंतर प्रत्यक्ष निवडणूकही घेण्यासाठीच्या कार्यवाहीबाबत पेंद्रीय निवडणूक आयोगासोबत पत्रव्यवहार सुरू असल्याचेही निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले.