
भिवंडी तालुक्यातील गोरसई गावातून वाहणाऱ्या कामवारी नदीत पोहण्यासाठी गेलेले दोघे सख्खे भाऊ बुडाल्याची घटना आज घडली. सागर धुमाळ (३०) व अक्षय धुमाळ (२५) अशी या भावांची नावे आहेत. नदीत वाहून गेलेल्या बेपत्ता भावांचा शोध घेण्यासाठी आपत्कालीन यंत्रणेची युद्धपातळीवर मोहीम सुरू आहे. दोघे सख्खे भाऊ बुडाल्याचे समजताच गावावर शोककळा पसरली आहे.
गोरसई गावातील सागर व अक्षय दुपारी ३ वाजता कामवारी नदीत पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. मुसळधार पावसामुळे पाणी पातळी वाढलेल्या नदीपात्रात अक्षय पाण्यात बुडत असताना त्याला वाचविण्याचा प्रयत्न करण्यासाठी सागर गेला, पण हे दोघेही पाण्यात बुडाले. दोघे बुडत असल्याचे पाहून नदीच्या काठावर असलेल्या एका तरुणाने या घटनेची माहिती ग्रामस्थांना दिली. यानंतर ग्रामस्थ आणि तरुणांनी नदीपात्रात उतरून त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला. याबाबतची माहिती भिवंडी अग्निशमन व आपत्कालीन यंत्रणेला दिल्यानंतर नायब तहसीलदार आदेश म्हात्रे यांच्यासह बचाव व मदत पथक तातडीने घटनास्थळी आले. सायंकाळपर्यंत शोधमोहीम सुरू होती. अंधार पडल्यानंतर शोधमोहीम थांबवली.