
जातनिहाय जनगणना कधीपासून सुरू होणार याची तारीख केंद्र सरकारने जाहीर केली आहे. देशात जातनिहाय जनगणना दोन टप्प्यात पूर्ण केली जाईल. या जनगणनेचा पहिला टप्पा 1 ऑक्टोबर 2026 पासून सुरू होईल. तर दुसऱ्या टप्प्याची सुरुवात ही 1 मार्च 2027 पासून होईल. या जातनिहाय जनगणनेच्या तारखेचे कनेक्शनही सत्ताधारी भाजपने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीशी जोडल्याची चर्चा आहे.
जातनिहाय जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात चार राज्यांचा समावेश आहे. जम्मू-कश्मीर, लडाख, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात जातनिहाय जनगणना केली जाईल. यानंतर दुसऱ्या टप्प्याची सुरुवात ही 1 मार्च 2027 पासून होईल. स्वातंत्र्यानंतर प्रथमच जातनिहाय जनगणना होत आहे. 1931 नंतर हिंदुस्थानात जातनिहाय जनगणना झाली नव्हती. मात्र, देशात प्रत्येक 10 वर्षांनी जनगणना होते. यापूर्वीची जनगणना ही 2011 मध्ये झाली होती. यानंतर 2021 ला जनगणना होणं अपेक्षित होतं. आता 15 वर्षांनी म्हणजे 2026 मध्ये जनगणना होत आहे.
जातनिहाय जनगणना करण्याची मागणी देशात बऱ्याच कालावधीपासून करण्यात येत होती. अखेर गेल्या महिन्यात केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला. 1931 नंतर म्हणजे 94 वर्षांनी देशात जातनिहाय जनगणना होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात 1 मार्च 2027 पासून इतर राज्यांत जातनिहाय जनगणना सुरू होईल. हा असा काळा आहे ज्यावेळी उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असेल किंवा शेवटच्या टप्प्यात असेल. 2022 आणि 2017 च्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा लक्षात घेतल्या जनगणनेची सुरुवात ही नव्या सरकारच्या शपथविधीपूर्वी होईल.