मध्यवर्ती म.ए. समितीचा बुलंद आवाज हरपला, दीपक दळवी यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक अर्जुनराव दळवी यांचे आज निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. मराठी भाषिक चळवळीचे केंद्र असलेल्या बेळगाव येथे टिळकवाडीतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दीपक दळवी यांच्या निधनाने महाराष्ट्र-कर्नाटक सीमालढा चळवळीतील मराठी भाषिकांचा बुलंद आवाज हरपला आहे.

दीपक दळवी यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. शहापूर स्मशानभूमीत सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. ‘बेळगाव, निपाणी, कारवार, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ यासाठी दीपक दळवी यांनी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांच्यावर कानडी पोलिसांकडून अनेक गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले. मराठी भाषिकांवर होणाऱया कानडी अत्याचारांविरोधात त्यांचा संघर्ष कायम होता. यातूनच तीन वर्षांपूर्वी कानडी गुंडांनी पोलिसांच्या गराडय़ात अंगावर काळा रंग टाकून दीपक दळवी यांच्यासह मराठी भाषिकांवर दहशत माजविण्याचा प्रयत्न केला होता. दळवी यांच्या निधनाने महाराष्ट्र एकीकरण समितीची अपरिमित हानी झाली असून, सीमाभाग दुःखाच्या सागरात बुडाला आहे.