प्रवरेत रसायनयुक्त पाणी सोडले, संबंधितांवर कठोर कारवाई करा; कृती समितीची मागणी

प्रवरा नदीपात्रात रसायनयुक्त काळे पाणी सोडणा ऱ्यांची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी प्रवरा नदी बचाव कृती समितीने केली आहे. याबाबत प्रांताधिकारी हिंगे यांना निवेदन देण्यात आले आहे. निळवंडे धरणातून उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले आहे. विशेष म्हणजे, हे आवर्तन पिण्याच्या पाण्यासाठी असतानाही आवर्तन सुरू होताच सलग दोन ते तीन दिवस या पाण्यात रसायनयुक्त पाणी सोडण्यात आल्याचे नदीकाठच्या गावांतील ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. याबाबत प्रवरा नदी बचाव कृती समीतीने महसूल, पशुसंवर्धन, जलसंपदा आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिका ऱ्यांना याची गंभीर दखल घेण्यास सांगितले होते. आज प्रवरा नदी बचाव कृती समितीच्या वतीने संगमनेरचे प्रांताधिकारी हिंगे यांची भेट घेऊन रसायनयुक्त पाणी सोडणा ऱ्यांची चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

शिष्टमंडळाने काही दिवसांपूर्वी प्रवरा नदीपात्रात रसायनयुक्त पाणी सोडण्यात आल्याचे निदर्शनास आणून दिले होते. या पाण्यामुळे शेतीजमिनीची हानी होत असून, पिण्यासाठी पाणी वापरले जात असल्याने ग्रामस्थांसह जनावरांचे आरोग्यही धोक्यात येत आहे. याप्रसंगी सचिन शिंदे, राहुल दिघे, रवींद्र थोरात, रवींद्र गाढे, गोकुळ दिघे, उत्तम वर्पे, प्रवीण शेपाळ, दादा गुंजाळ, इंद्रभान दिघे, अमोल खुळे, ज्ञानदेव पर्बत यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.