
महिला संरक्षण, शक्ती कायदा वगैरे सगळे थोतांड असल्याचे वारंवार स्पष्ट होत आहे. दोन वेळा पतीच्या विरोधात तक्रार देऊनही पोलिसांनी दखल न घेतल्याने दोन निष्पाप मुले अनाथ झाली. अत्यंत थंड डोक्याने या पतीने भरदिवसा, पेट्रोल पंपावर आपल्या पत्नीचा गळा चिरला आणि पळून गेला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कचनेरपर्यंत पाठलाग करून या नराधमाला अटक केली.
चित्तेपिंपळगाव येथील पूजा गावंडे (27) ही गेल्या दीड महिन्यापासून जालना महामार्गावरील शिवसमर्थ पेट्रोल पंपावर नोकरी करत होती. दुपारी 12.30 वाजता अचानक तिचा पती सत्यम गावंडे (28) हा तेथे आला. मोटरसायकल उभी करून त्याने पूजाला पकडले. पूजाने सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला. पण सत्यमने तिच्यावर पाठीमागून चाकूचा वार केला आणि तिला खाली पाडले. त्यानंतर त्याने पूजाचा गळा चिरला.
वेळीच तक्रारीची दखल घेतली असती तर…
पूजाने तीन महिन्यांपूर्वी करमाड पोलीस ठाण्यात सत्यमच्या विरोधात फिर्याद दिली होती. मात्र पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही. 7 एप्रिल रोजीही सायंकाळी 5 वाजेपासून 9 वाजेपर्यंत पूजा तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात बसून होती. परंतु, पोलिसांनी तिच्याकडे लक्षही दिले नाही.





























































