लेख – बांगलादेश, पाकिस्तान आणि चीन युती

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन

चीन, पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील वाढती जवळीक भारतासाठी अधिक गंभीर आव्हान उभे करते. चीन बांगलादेशचा वापर भारतावर दबाव आणण्यासाठी, विशेषतः ईशान्येकडील राज्यांवर लक्ष ठेवण्यासाठी करू शकतो. चीन बांगलादेशला आर्थिकदृष्टय़ा परावलंबी बनवून आणि लष्करी सहकार्य वाढवून भारताच्या सुरक्षा व आर्थिक विकासासाठी धोका निर्माण करू शकतो. त्यामुळे भारताला या घडामोडींवर लक्ष ठेवणे आणि चीनच्या या प्रयत्नांना निष्प्रभ करण्यासाठी योग्य पावले उचलणे आवश्यक आहे.

भारताने केलेल्या अमूल्य मदतीमुळेच जन्माला आलेला बांगलादेश ती पृतज्ञता केव्हाच विसरला आहे. बांगलादेशचे झपाटय़ाने मूलतत्त्ववादीकरण आणि इस्लामीकरण करण्याचे प्रयत्न जारी आहेत. युनूसना राजकीय शहाणपण अजिबात नसावे. दरवर्षी बांगलादेशच्या स्वातंत्र्यदिनी ढाक्यात लष्करी संचलन होत असते. ते रद्द करून युनूस चीनला गेले. त्यांनी तिथे भारताविषयीचा आपला आकस स्पष्ट केला. त्यामुळेच चीनमध्ये जाऊन ‘ईशान्य भारतासाठी आम्हीच समुद्राचे रक्षणकर्ते आहोत,’ अशी दर्पोक्ती त्यांनी केली. वर चीनला त्यांची बंदरे वापरण्याची मुभाही देऊन टाकली.

येत्या काळात भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध सुधारण्याची शक्यता कमी दिसते. बांगलादेशच्या प्रमुख मागण्या भारताला पूर्ण करणे शक्य नाही. माजी पंतप्रधान शेख हसीना यांना बांगलादेशच्या ताब्यात द्यावे ही मागणी पूर्ण होऊ शकत नाही. गंगा नदी पाणी वाटप कराराची मुदत काही महिन्यांत संपत आहे आणि बांगलादेशला या करारावर भारताने त्वरित स्वाक्षरी करावी अशी अपेक्षा आहे. याव्यतिरिक्त त्यांना तिस्ता नदीचे पाणी हवे आहे, जे भारताला स्वतःच्या पाणीटंचाईमुळे देणे शक्य नाही.

पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील संबंध सुधारल्यास भारताचे काही प्रमाणात नुकसान होऊ शकते. पाकिस्तान पुन्हा एकदा ईशान्य भारतातील बंडखोर गटांना मदत करून तेथील दहशतवाद पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न करू शकतो, जरी त्यात त्यांना फारसे यश मिळण्याची शक्यता नाही. मात्र पाकिस्तान रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिकांना भारतात घुसखोरी करण्यासाठी सतत प्रोत्साहित करत राहील, जे भारतासाठी धोकादायक आहे. विशेषतः हिंसक असलेले रोहिंग्या भारतातील विविध हिंसाचाराच्या घटनांमध्ये सहभागी होऊ शकतात.

मुर्शिदाबाद जिह्यात नुकत्याच झालेल्या हिंसाचारात आणि हिंदूंवर झालेल्या हल्ल्यांमध्ये बांगलादेशमधून आलेल्या रोहिंग्या किंवा बांगलादेशींचा मोठा हात होता. जर सीमा सुरक्षा दल सीमेवर तैनात असेल, तर मोठय़ा संख्येने घुसखोर मुर्शिदाबाद जिह्यात येऊन हिंसा पसरवून पुन्हा कसे परत जाऊ शकतात, याचा जाब BSF ला विचारणे आवश्यक आहे.

ज्याप्रमाणे पाकिस्तान पंजाबमध्ये अफू आणि चरसचा दहशतवाद मोठय़ा प्रमाणात करत आहे, त्याचप्रमाणे या सीमेवरही करण्याचा प्रयत्न करेल आणि तो कसा थांबवायचा हे BSF समोर मोठे आव्हान असेल. अर्थात व्यापार संबंधांमध्ये पाकिस्तान भारताची जागा कधीही घेऊ शकणार नाही. कारण दोन्ही देशांमधील अंतर खूप जास्त आहे. याशिवाय पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये अनेक अडथळे आहेत, जे पार करणे कठीण आहे. उदाहरणार्थ, बांगलादेश पाकिस्तानकडून त्यांची संपत्ती परत मागत आहे, जी पाकिस्तान कधीही देणार नाही. तसेच 1971 च्या युद्धात 40 लाख बांगलादेशी नागरिकांच्या हत्याप्रकरणी माफी मागण्याची मागणी बांगलादेश करत आहे, जे होण्याची शक्यता कमी आहे. पाकिस्तान आणि बांगलादेशचे संबंध सुधारले तरी त्यांच्यात व्यापार किंवा आर्थिक संबंध फारसे वाढू शकत नाहीत. मात्र पाकिस्तानची बांगलादेशच्या भूमीतून भारताला त्रास देण्याची क्षमता नक्कीच वाढेल आणि यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

चीन बांगलादेशसोबतचे व्यापार संबंध वाढवण्याचा प्रयत्न करत आहे आणि बांगलादेशमधील स्वस्त मनुष्यबळाचा वापर करून तेथे उत्पादन करणारे कारखाने नक्कीच उभारू शकतो, ज्यावर आपले लक्ष असले पाहिजे. इतर देशांप्रमाणे चीन बांगलादेशमधील काही बंदरे आणि रस्ते तयार करून त्याला कर्जबाजारी बनवेल, जसे त्याने पाकिस्तानला बनवले आहे. यामुळे बांगलादेश चीनचा आर्थिक गुलाम बनेल, जो भारतासाठी धोका आहे. याशिवाय चीन बांगलादेशला चीनमध्ये बनलेली शस्त्रs खरेदी करण्यास सांगत आहे आणि नवीन शस्त्रांचे प्रशिक्षण देण्यासाठी अनेक चिनी सैन्य अधिकारी बांगलादेशात वेळोवेळी येत राहतील. उदाहरणार्थ, चीनने बांगलादेशला दोन पाणबुडय़ा दिल्या आहेत, ज्या बांगलादेशला चालवता येत नाहीत आणि त्यामुळे मोठय़ा संख्येने चिनी नौसैनिक तेथे तैनात आहेत, जे बंगालच्या उपसागरात गस्त घालतात आणि भारतावर लक्ष ठेवण्याचे काम करतात.

अशा प्रकारे बांगलादेशचा वापर भारतावर, विशेषतः ईशान्य भारतावर लक्ष ठेवण्यासाठी केला जाईल. चीन बांगलादेशच्या हद्दीत भारताच्या सिलीगुडी का@रिडॉरजवळ सैन्याचा तळ स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहे, जे भारतासाठी धोकादायक आहे. थोडक्यात, चीन बांगलादेशमध्ये करत असलेल्या लष्करी आणि आर्थिक हालचालींवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे आणि चीनला निष्क्रिय करण्यासाठी वेळोवेळी लष्करी आणि आर्थिक पावले उचलावी लागतील.

मात्र सध्या अमेरिकेशी सुरू असलेल्या आयात कर युद्धामुळे चीनवर मोठा आर्थिक दबाव आहे आणि या दबावाला तोंड देण्यासाठी चीनने अनेक वेळा भारताला सहकार्य करून अमेरिकेविरुद्ध काम करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र भारताने या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले आहे आणि आपण अमेरिकेबरोबर ‘मुक्त व्यापार करारा’वर लवकर स्वाक्षरी करण्यावर भर देत आहोत. ज्यामुळे आपण या कर युद्धाचे शिकार होणार नाही आणि भारत-अमेरिका संबंध अधिक मजबूत होतील. ज्याचा फायदा भारताला तंत्रज्ञान हस्तांतरण आणि अमेरिकेकडून नवीन अत्याधुनिक शस्त्रs मिळवण्यात होऊ शकतो, विशेषतः GE 414 इंजिन किंवा अमेरिकेकडून मिळणारे अत्याधुनिक ड्रोन. असे करार लवकर करण्यात यावे.