
आरे ते कुलाबादरम्यानच्या भुयारी मेट्रो मार्गिकेचा दुसरा टप्पा पुढील आठवडय़ात प्रवासी सेवेसाठी खुला होण्याची शक्यता आहे. सध्या मेट्रो रेल सुरक्षा आयुक्तांमार्फत (सीएमआरएस) या टप्प्याची सुरक्षाविषयक तपासणी सुरू आहे. ही तपासणी तीन-चार दिवसांत पूर्ण होऊन सीएमआरएसकडून प्रमाणपत्र मिळल्यानंतर मुंबईकरांसाठी वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) ते वरळी आचार्य अत्रे चौकपर्यंत भुयारी मेट्रो प्रवास खुला होणार आहे.
सध्या आरे जेव्हीएलआर ते बीकेसी या मार्गावर भुयारी मेट्रो-3 ची सेवा सुरू आहे. सुरक्षाविषयक प्रमाणपत्र न मिळाल्याने या मेट्रोचा दुसरा टप्पा खुला झालेला नाही. दुसऱया टप्प्याची मार्च महिन्याची डेडलाइन चुकली. त्यावर टीका होऊ लागल्यानंतर दुसऱया टप्प्याच्या सुरक्षाविषयक तपासणीला गती देण्यात आली आहे. सोमवारपासून ही तपासणी सुरु झाली असून पुढील तीन-चार दिवसांत तपासणी पूर्ण होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यानुसार आठवडाभरातच भुयारी मेट्रोचा बीकेसी ते वरळी आचार्य अत्रे चौकपर्यंतचा 9.6 किमी अंतराचा मार्ग प्रवासी सेवेसाठी खुला होण्याची शक्यता आहे. पवई, सीप्झ परिसरातून दादर, वरळी परिसरात येणाऱया मुंबईकरांना याचा फायदा होणार आहे.
पहिल्या टप्प्यातील
स्थानके (12.5 किमी)
– आरे जेव्हीएलआर
– सीप्झ
– एमआयडीसी
– मरोळ नाका
– सीएसएमआयए (टी 2)
– सहार रोड
– सीएसएमआयए (टी 1)
-सांताक्रुझ
– वांद्रे कॉलनी
– बीकेसी
दुसऱया टप्प्यातील स्थानके (9.6 किमी)
– धारावी -शितलादेवी मंदिर
– दादर -सिद्धिविनायक
– वरळी – आचार्य अत्रे चौक
मिठी नदीखालून धावणार मेट्रो
मेट्रो-3चा दुसरा टप्पा प्रवाशांच्या सोयीबरोबरच अभियांत्रिकीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा मानला जात आहे. बीकेसी ते धारावी जोडण्यासाठी मिठी नदीखालून भुयारी मेट्रो मार्गिकेचे बांधकाम करण्यात आले आहे. मिठी नदीखाली तीन बोगद्यांचे काम केले आहे.