
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यास मोदी सरकार टाळाटाळ करीत आहे. या नामकरणासाठी राज्य सरकारने 16 जुलै 2022 रोजी केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला होता. या प्रक्रियेला आता तीन वर्षे पूर्ण होत आली असली तरी विमानतळाला दिबांचे नाव देण्यासाठी कोणत्याही हालचाली केंद्र सरकारने केल्या नाहीत. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. नवी मुंबई विमानतळाला दिबांचे नाव देण्यासाठी केंद्र सरकारने चालढकलपणा न करता येत्या 23 जूनपर्यंत अधिसूचना काढावी, अन्यथा 24 जून या दिबांच्या स्मृतिदिनापासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात येणार आहे, असा इशारा कृती समितीने दिला.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव देण्यासाठी 2020 पासून सर्वपक्षीय कृती समितीच्या नेतृत्वाखाली विविध प्रकारची आंदोलने सुरू आहेत. विमानतळाला दिवांचे नाव देण्यासाठी राज्य सरकारने 16 जुलै 2022 रोजी नामकरणाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला असल्याचे जाहीर केले होते. हा प्रस्ताव पाठवून तीन वर्षांचा कालावधी उलटत आला आहे. तरीही नामकरणाबाबत केंद्र सरकारने अद्यापही कोणतीही अधिसूचना काढलेली नाही. राज्य सरकार नुसती पोकळ आश्वासने देऊन प्रकल्पग्रस्त जनतेच्या तोंडाला पाने पुसत आहे. तर केंद्र सरकार नामकरणाबाबत अद्याप अवाक्षरही काढण्यास तयार नाही.
भाजप भूमिका स्पष्ट करीत नाही
विमानतळाच्या नामांतरणाबाबत मुख्यमंत्र्यांबरोबर तातडीने बैठक लावण्याची तयारी सुरू केली आहे. दिबांच्या नावासाठी सर्व राजकीय पक्ष आग्रही असले तरी भाजपने मात्र सावधगिरीचा पवित्रा घेतला आहे. केंद्र सरकारकडूनही भूमिका स्पष्ट करण्यात अक्षम्य दिरंगाई केली जात आहे. यामुळे कृती समितीचे सरचिटणीस भूषण पाटील यांनी घेतलेल्या आंदोलनाच्या भूमिकेला पाठिंबा दिला जाणार आहे. या आंदोलनाबाबत कृती समितीची बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी व्यक्त केली आहे.
विमानतळ प्रकल्पात स्थानिक भूमिपुत्रांना नोकऱ्या देण्याच्या प्रश्नावरही केंद्र व राज्य सरकार मूग गिळून गप्प बसले आहे. केंद्र व राज्य सरकारच्या वेळकाढू धोरणामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये संतापाचा भडका उडाला आहे.
येत्या 23 जूनपर्यंत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव देण्याची अधिसूचना केंद्र सरकारने जारी करावी. अन्यथा 24 जून या दिवांच्या स्मृतिदिनापासून आमरण उपोषण सुरू करण्यात येणार आहे, असा इशारा कृती समितीचे सरचिटणीस भूषण पाटील यांनी दिला आहे.
नवी मुंबई विमानतळाच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले आहे. ऑगस्ट महिन्यात विमानतळाचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे. नवी मुंबईतून विमानाचे टेकऑफ होण्यासाठी फक्त दोन महिन्यांचा कालावधी उरलेला असतानाही नामांतरणाबाबत कोणताही निर्णय झालेला नाही त्यामळे प्रकल्पग्रस्तांनी संताप व्यक्त केला आहे.