
महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाने हातपाय पसरायला सुरुवात केली असून आठवड्याभरात सक्रिय रुग्णांचा आकडा 3 हजारावर पोहोचला आहे. गेल्या चार दिवसांमध्ये सक्रिय रुग्णसंख्ये झपाट्याने वाढताना दिसली. 26 मे रोजी हिंदुस्थानमध्ये 1010 रुग्ण होते, आता हाच आकडा 2710 वर पोहोचला आहे, अशी माहिती आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे.
केरळमध्ये सर्वाधिक रुग्ण असून महाराष्ट्र दुसऱ्या नंबरवर आहे. केरळमध्ये कोविड बाधितांचा आकडा 1147 वर गेला आहे, तर महाराष्ट्रात 424, दिल्लीमध्ये 294, गुजरातमध्ये 223, तामिळनाडूमध्ये 148, कर्नाटकमध्ये 148 आणि पश्चिम बंगालमध्ये 116 रुग्णांची नोंद झाली आहे.
राजस्थानमध्ये 51, उत्तर प्रदेशमध्ये 42, पुद्दुचेरीमध्ये 25, हरयाणामध्ये 20, आंध्र प्रदेशमध्ये 16, मध्ये प्रदेशमध्ये 10, गोव्यात 10 आणि ओडिशा, पंजाब आणि जम्मू-कश्मीरमध्ये प्रत्येकी 4 रुग्ण आढळले आहेत. तर बिहारची आकडेवारी अद्याप उपलब्ध झालेली नाही.
दरम्यान, कोविडच्या नव्या व्हेरियंटची लागण होऊन किमान 7 जणांचा मृत्यू झाला आहे. यात महाराष्ट्रातील दोघांचा, तर दिल्ली, गुजरात, कर्नाटक, पंजाब आणि तामिळनाडूतील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. पंजाबमध्ये एक तरुण रुग्ण वगळता इतर ठिकाणी सर्व मृत ज्येष्ठ नागरिक होते आणि ते इतर गंभीर आजारांशीही झुंज देत होते, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. कोरोनाची लागण झालेले रुग्णांना सौम्य लक्षणे असून घाबरून जाण्याची गरज नाही, असे आवाहनही करण्यात आले आहे. मात्र सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.
कोरोनाच्या नव्या व्हेरियंटबाबत चिंता करण्याची आवश्यकता नाही. पण आपण सतर्क राहिले पाहिजे. सरकार आणि वैद्यकीय संस्था परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. गंभीर आजार असणाऱ्या किंवा रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्यांनी कोणताही संसर्ग टाळण्याचा सल्ला आयसीएमआरचे महासंचालक डॉ. राजीव बहल यांनी दिला.