
वारसा हक्कातील जमिनीच्या वादातून श्रीरामपुरात कोट्यवधी रुपयांचा बोगस दस्त नोंदवून, फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. शहरातील कुंभार गल्ली परिसरातील शेतकरी दीपक लक्ष्मण डावखर (वय 53) यांनी आपल्या आई, बहिणी, मेहुणे तसेच शहरातील काही उद्योजकांविरुद्ध फसवणूक, बनावट दस्त नोंदणी व धमकाविल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
दीपक लक्ष्मण डावखर यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, त्यांची श्रीरामपूर नगरपालिका हद्दीतील जुना गट 81/1, व नवीन गट 100/9 मधील क्षेत्रफळ 3.71 हेक्टर शेतजमीन वडील लक्ष्मण परशुराम डावखर यांच्या सन 2011 मधील मृत्युपत्राद्वारे त्यांच्या नावावर झाली होती. या जमिनीचा 7/12 उतारा व मालकी नोंद आजही त्यांच्या नावावर आहे. तरीसुद्धा कुटुंबातील काही सदस्यांनी आणि बाहेरील उद्योजकांनी संगनमत करून कोर्टाच्या स्थगिती आदेशाची पायमल्ली करत खोटा करार नोंदवला, असा गंभीर आरोप त्यांनी फिर्यादीत केला आहे.
डावखर यांनी आई सुशीला लक्ष्मण डावखर व बहीण वैशाली शिवराम साठे, अर्चना भास्कर दिघे यांनी इतर नातेवाईक व उद्योजक शेख अंजुम परवेज मुसा अहमद, पत्नी शेख समीना अंजुम, मुलगा शेख अंजर अंजुम (रा. नफीस पॅलेस, श्रीरामपूर) यांच्या संगनमताने हा व्यवहार केला. या व्यवहारात एक कोटी रुपयांचा मोबदला देण्यात आला असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. 5 जानेवारी 2023 रोजी दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदवताना त्यांची व बहीण मीना प्रभाकर खर्डे यांची कोणतीही सही किंवा संमती न घेता, अपूर्ण वंशावळ दाखवून बोगस दस्त नोंदविण्यात आला. न्यायालयीन खटला सुरू असतानाही सब-रजिस्ट्रार कार्यालयाने हा दस्त नोंदवला, ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
यापूर्वी सन 2021-22 मध्ये विलास सासे आणि अनिल इंगळे यांच्याशी झालेल्या जमीन व्यवहारात ठरलेले धनादेश न वटल्याने व्यवहार अपूर्ण राहिला. मात्र, त्याच जमिनीचा ताबा जबरदस्तीने घेण्यासाठी संबंधितांनी त्यांना धमकावले आणि मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याचेही त्यांनी फिर्यादित नमूद केले आहे. यानंतर वैशाली साठे, अर्चना दिघे, जनाबाई डावखर, सुशीलाबाई डावखर, अनिल इंगळे, विलास सासे, शेख अंजुम या सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अंजुम शेख यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

























































