तब्येत बरी नसतानाही दीपक पाठक पुन्हा कामाला गेले, पण घरी परतलेच नाही

अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमानाच्या अपघातात 290 लोक मारले गेले आहेत. त्यात केबिन क्रू म्हणून काम करणारे बदलापूरचे रहिवासी दीपक पाठक यांचाही समावेश आहे. दीपक यांची तब्येत बरी नव्हती. तरी ते कामावर हजर झाले होते. त्यानंतर ते घरी परतलेच नाही. या अपघातात त्यांचाही मृत्यू झाला आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे. दीपक पाठक हे 36 वर्षांचे होते. चार वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले होते. तर सहा महिन्यांपूर्वी त्यांची बढती होऊन ते केबिन क्रू मध्ये त्यांचा समावेश झाला होता. दीपक कामावर असताना 10 ते 15 दिवस घरी येत नसत. यावेळी दीपक घरी 10-15 दिवसांनंतर आले होते. पण त्यांची तब्येत बिघडली होती, म्हणून त्यांनी रजा टाकली होती. पण कर्मचारी कमी असल्यामुळे त्यांन कामावर बोलावण्यात आलं होतं. आजारपण बाजूला ठेवून दीपक कामावर निघून गेले होते. दीपक कुठेही असले की ते आईला फोन करायचे आणि काळजी घ्यायला सांगायचे. 11 जूनलाही दीपक यांनी आपल्या आईला फोन केला आणि लंडनसाठी निघालोय अशी माहिती दिली.

थोड्या वेळानंतर सर्व वृत्तवाहिन्यांवर विमानाच्या अपघाताची बातमी आली. पण आपला दीपक वाचला असेल अशी त्यांना आशा होती. त्यांनी दीपकला फोन केला पण दीपक फोन उचलत नव्हते. थोड्या वेळाने दीपक यांचा फोन स्विच ऑफ झाला आणि टीव्हीवर दीपक यांचा मृत्यू झाल्याची बातमी झळकली. या बातमीमुळे दीपक यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे. दीपक यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या आई वडिलांना मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे डीएनए टेस्टसाठी दीपक यांच्या बहीण अहमदाबादसाठी रवाना झाले आहेत.