लोकशाहीचा गळा घोटला जात आहे; विजय वडेट्टीवार यांचा आरोप

उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी होणारी मतमोजणी पुढे ढकलली असून आता 21 डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहेत. न्यायालयाच्या या निर्णयावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या आदेशाने निवडणुकीचा खेळखंडोबा झाला आहे. मत चोरीचा हा प्रकार नाही ना? निकाल बाजूने येणार नाही हे पाहून निवडणूक निकाल फिरवण्याचा प्रयत्न करत आहे का? असा सवाल करत लोकशाहीचा गळा घोटला जात आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

याबाबत विजय वडेट्टीवार यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, नागपूरच्या खंडपीठाने दिलेला आदेश निवडणुकीचा खेळखंडोबा झाला आहे, हा पोरखेळ आहे. राज्य सरकार आणि निवडणूक आयोग यासाठी जबाबदार आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा चुकीच अर्थ काढण्यात आला. ओबीसीला २७ टक्के आरक्षण दिले हे दाखवायचे होते, हे सरकार कोणत्या दिशेने काम करते?

उद्याची मतमोजणी २१ डिसेंबरला गेली. निवडणूक आयोग सरकारच्या हाताचे बाहुले झाले आहे, त्यांच्या इशाऱ्यावर काम करत आहे. इतक्या निवडणुका झाल्या याआधी असे कधीच झाले नव्हते. याला फडणवीस सरकार जबाबदार आहे. मतमोजणीत अडथळा येणे म्हणजे निवडणुका लांबणीवर टाकणं, पैशांचा वापर करत आहे , मत चोरीचा हा प्रकार नाही ना? निकाल बाजूने येणार नाही हे पाहून निवडणूक निकाल फिरवण्याचा प्रयत्न करत आहे का? लोकशाहीचा गळा घोटला जात आहे, असे त्यांनी म्हटले आहे.