
सरकारी वसतिगृहात राहणाऱया विद्यार्थ्यांना सातत्याने तेथील गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. याची गंभीर दखल घेऊन दलित, अनुसूचित जमाती, ओबीसी ईबीसी आणि अल्पसंख्याक विद्यार्थी राहत असलेल्या वसतिगृहांची अवस्था सुधारा. विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱया शिष्यवृत्तीचे पैसे वेळेवर द्या, अशी मागणी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे.
राहुल गांधी यांनी अलीकडेच बिहारमधील आंबेडकर वसतिगृहाला भेट दिली होती. यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांच्यापुढे मांडलेल्या समस्यांचा संदर्भ देत राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहिले आहे. 90 टक्के विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक संधींमध्ये अडथळा आणणाऱया दोन गंभीर समस्या सोडवण्याची मी तुम्हाला विनंती करतो. विद्यार्थ्यांसाठी असलेल्या निवासी वसतिगृहांची स्थिती दयनीय आहे. वसतिगृहात 6-7 विद्यार्थ्यांना एकाच खोलीत राहावे लागते. तिथे शौचालये स्वच्छ नाहीत, पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध नाही, जेवणाच्या सोयींचा अभाव आहे. त्यात तातडीने सुधारणा करण्यात यावी, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यास विलंब होत आहे. बिहारमध्ये शिष्यवृत्ती पोर्टल तीन वर्षांपासून बंद होते आणि 2021-22 मध्ये कोणत्याही विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती मिळाली नसल्याकडेही राहुल गांधी यांनी लक्ष वेधले आहे. जोपर्यंत खालच्या स्तरातील तरुण पुढे येत नाहीत तोपर्यंत भारत प्रगती करू शकत नाही, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.